
औरंगाबाद : रोहित्र वाहतुकीसाठी (Transformer Trasport) वाहन व्यवस्थेची तरतूद रोहित्र दुरुस्त करणाऱ्या एजन्सी किंवा महावितरणकडे (Mahavitaran) आहे. त्यामुळे नादुरुस्त किंवा दुरुस्त रोहित्रांच्या वाहतुकीसाठी शेतकऱ्यांनी कंत्राटदारांशी किंवा कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नयेत, अशी सूचना सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांनी केली आहे.
डॉ. गोंदावले यांच्या सूचनेनुसार, सध्या रब्बी हंगाम सुरू आहे. शेतीला सिंचनासाठी सुरळीत विद्युतपुरवठ्याची आवश्यकता असते. त्या दृष्टीने महावितरण प्रयत्नशील आहे. मंजूर भारापेक्षा अधिक विद्युतभाराच्या वापरामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांनी प्रमाणित कपॅसिटर बसवून अखंडित वीज वापराचा लाभ घ्यावा.
ग्रामीण भागातून वीजबिलापोटी ग्राहकांकडून जमा करण्यात आलेल्या बिलांचा भरणा काही ठिकाणी महावितरणकडे तत्काळ होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. वीज कर्मचारी व वीजबिल भरणा केंद्रांनी त्यांच्याकडे संकलित झालेली बिले तत्काळ महावितरणकडे जमा करावी. ग्राहकांनीही वीजबिलापोटीचे व्यवहारही पावतीशिवाय करू नये.
अनधिकृत वीज वापर करीत असलेल्या कृषिपंप धारकास तसेच अधिक भार, जसे की तीन एचपी मंजूर असताना पाच एचपीचा पंप वापरणे अशा कृषिपंपधारकांनी वीज पुरवठ्यासाठी किंवा अतिरिक्त भाराकरिता अर्ज करून नियमाने वीजजोडणी घ्यावी व वीज कायदा २००३ चे पालन करावे.
कृषिपंपास एल अँड टी, क्रॉम्टन, ग्रिव्हज, सुबोधन, कॅप्कोसारख्या आएसआय मानांकन असलेले कपॅसिटर बसविण्यात यावे. कपॅसिटर हा शेतकऱ्यांच्या पंपाचे आणि रोहित्राचेही बिघाड टाळतो. त्यामुळे शेतीला अखंडित वीजपुरवठा करणे सोयीचे होणार आहे, असे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. गोंदावले यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.