
Pune News : नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध हरिश्चंद्रगडावर पर्यटनासाठी जाताना स्थानिक वाटाड्यांची मदत घ्यावी. तसेच टोलारखिंडीत वनखात्याच्या तपासणी नाक्यावर नोंदणी करावी, असे आवाहन वन विभागाच्या सूत्रांनी केले आहे.
पुण्याहून सहा पर्यटकांचा एक गट मंगळवारी (ता. १) हरिश्चंद्रगडावर गेला होता. या गटात हरीओम विठ्ठल बोरुडे, महादू जगन भुतेकर, तुकाराम आत्माराम तिपाले, गोविंद दत्तात्रेय आंबेकर आणि अनिल ऊर्फ बाळू नाथाराव गिते (वय ३२ वर्षे, रा. लोहगाव, जि. पुणे) यांचा समावेश होता. “गडाभोवती सध्या दाट धुके, पाऊस आहे.
वाटा सापडत नाहीत. मात्र मंगळवारी हा गट गडावर वाट चुकला. बालेकिल्ल्याजवळील वाटेने जाण्याऐवजी सात टेकड्यांच्या वाटेने गेला. अतिश्रम झाल्यामुळे यातील अनिल गितेचा वाटेतच मृत्यू झाला,” असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
चुकलेल्या या गटाला स्थानिक शेतकरी बाळू रेंगडे व त्याचा भाऊ मारुती रेंगडे यांनी मदत केली. तसेच वन खात्याचे विजय नाडेकर, शरद भांगले, गौरव मेमाणे, महादू भांगरे यांनी वेळीच शोध मोहीम राबवली. वन खात्याने गेल्या महिन्यात भरकटलेल्या २० जणांना जंगलातून सुरक्षित बाहेर काढले होते. तसेच नगर जिल्ह्यातील सहा जणांच्या भरकटलेल्या आणखी एका गटाला देखील सुखरूप गडाखाली आणले होते.
स्थानिक शेतकरी वाटाड्या म्हणून उपलब्ध
वन खात्याच्या म्हणण्यानुसार, टोलारखिंडीत अवघे ३० रुपये शुल्क भरल्यावर पर्यटकांना गडावर प्रवेश मिळतो. या ठिकाणी नोंद केली जाते. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत संपर्क किंवा मदतीसाठी वन खात्याचे कर्मचारी धावून येतात.
परंतु नोंद न करता पर्यटक गेल्यास वेळेत मदत करण्यात अडचणी उद्भवतात. तसेच स्थानिक शेतकरी वाटाडे म्हणून उपलब्ध असतात. त्यांची मदत घेतल्यास स्थानिक शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाला हातभार लागतो.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.