Mahad News : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीने सार्वजनिक तसेच खासगी मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे अस्मानी संकटांमुळे खचलेल्या आपत्तीग्रस्तांच्या मदतीला सरकार आले असून जिल्ह्यातील ५ हजार ५९४ नुकसानग्रस्तांना ५४ लाखांचा निधी वर्ग झाला आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने अक्षरशः कहर केला होता. महाड ,पोलादपूर,श्रीवर्धन , रोहा नागोठणे, पेण अशा भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. अतिवृष्टीमुळे खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळून २९ जणांना जीव गमवावा लागला तर ५७ जण बेपत्ता आहेत. सावित्री,अंबा, कुंडलिका, गाढी व उल्हास नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने शेकडो गावांना फटका बसला होता.
इर्शाळवाडी मदतीपासून वंचित
इर्शाळवाडी दुर्घटनेत मृत्यूमुखी म्हणून जाहिर झालेल्या २७ जणांच्या नातेवाईकांसाठी ५ लाख रूपयांची मदत आलेली असतानाही तिचे अद्याप वाटप झालेले नाही. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने राबवलेल्या बचाव व शोध मोहिमेत २७ जणांचे मृतदेह आढळून आले.
तर ५७ जणांचा शोध लागलेला नाही. त्यांना मृत म्हणून घोषीत करण्यासाठी काही दिवस लागणार आहेत, त्यानंतरच या सर्व मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्याचे पाऊल जिल्हा प्रशासनाने उचलले आहे.
४५२ घरांची पुनर्बांधणी
आपत्ती काळामध्ये निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केलेल्या ५ हजार ९६ नागरिकांसाठी २९ लाख २४ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तर ४५२ घरांच्या पुनर्बांधणीसाठी चार लाख ९८ हजार रुपये दिले जाणार आहेत. मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाईसाठी १५ लाख ८३ हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.