
Kolhapur Kharif News : कोल्हापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याचबरोबर मागच्या चार दिवसात उन्हाचा तडाखा बसत असल्याने खरीप पिकांवर किडींचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे.
तर जिल्ह्यातील महत्वाचे पीक असलेल्या उसावर लोकरी मावा आणि तांबेऱ्याचे संकट घोंघावत असून भुईमूग, भातावरही तांबेरा किडीचा प्रादुर्भाव दिसत असल्याने शेतकरी संकटात सापडण्याची भिती आहे.
जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरूवात झाल्याने यंदा पेरण्या लांबणीवर गेल्या आहेत. यामुळे खरीप पिकांची पेरणी आणि उगवण जुलै महिन्यातच झाली. दरम्यान मागच्या महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पिकांची उगवण चांगली झाली.
परंतु या महिन्यात पावसाचा जोर हळूहळू कमी होत गेला. गेल्या चार-पाच दिवसांपासून तर डोंगराळ तालुके वगळता इतर ठिकाणी पूर्णपणे उघडीप आहे. त्यात बुधवारपासून कडकडीत ऊन पडले आहे.
पुढचे काही दिवस पाऊस नाही झाला तर पीके वाळण्याची शक्यता आहे. अशातच कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. तो त्वरित चालू करण्याची विनंती इरिगेशन फेडरेशनकडून करण्यात आली आहे.
दरम्यान या वातावरणामुळे किडींसाठी पोषक ठरत असल्याने पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. ऊस पिकावर लोकरी माव्याचे संकट पुन्हा घोंघावत आहे. दरम्यान, आज, शनिवारपासून जिल्ह्याच्या तापमानात थोडी घट होऊन काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
काल (ता.११) जिल्ह्याचे कमाल तापमान ३० डिग्रीच्या पुढे गेले होते. त्यात किमान तापमान २३ डिग्रीपर्यंत राहिल्याने दुपारी अंगाला चटके बसत होते. तर रात्री उष्णता वाढली होती. दरम्यान एकदम ऊन पडल्याने हे वातावरण आरोग्यासाठी त्रासदायक ठरत आहे. यामुळे ताप, डोकेदुखीच्या रुग्णांत वाढ होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.