
Nagar News : जिल्ह्यात यंदा पुरेसा पाऊस नसल्याने खरिपातील बहुतांश पिके वाया गेलीच आहेतच, पण पाऊस नसल्याचे गंभीर परिणाम पशुधनावरही होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यात ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत १३ लाख ३७ हजार २०७ टन चारा उपलब्ध आहे. जिल्ह्याला महिन्याला आठ लाख टन चारा लागतो. त्यामुळे उपलब्ध चारा केवळ सव्वा ते दीड महिना पुरेल. पाऊस न झाल्यास गंभीर चारा टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गाय, म्हैस वर्गातील १६ लाख जनावरे आहेत. त्यात पावणे तीन लाख वासरे असून १३ लाख २३ हजार मोठी जनावरे आहेत. सुमारे पावने पंधरा लाख शेळ्या-मेंढ्यां आहेत. याशिवाय, गाढव, घोड्यांची संख्या वेगळी आहे.
ज्या पशुधनाची, दुभत्या जनावरांची संख्या अधिक आहे, अशा कोपरगाव, राहाता, राहुरी, संगमनेर भागांत चारा लागवड कमी असल्याने चाऱ्याची उपलब्धताही कमी आहे. श्रीगोंदा, नेवासा, संगमनेर तालुक्यांत तर २० दिवस पुरेल एवढाच चारा आहे. त्यामुळे चारा टंचाई गंभीर होण्याची चिन्हे आहेत.
डोंगरं, माळरानंही ओसाड
पावसाळा सुरु झाला की, डोंगर, कुरणात जनावरांसाठी चारा उपलब्ध होतो. त्यामुळे पावसाळ्यात चारा उपलब्ध नसला तरी फार अडचणीला सामोरे जावे लागत नाही. यंदा मात्र अजूनही बहुतांश भागात पुरेसा पाऊस नाही. डोंगर, कुरणांसह माळरानांवर चारा नाही. त्यामुळे शेळ्या-मेंढ्यांसह चराईवर जाणाऱ्या जनावरांची अडचण झाली आहे.
उपलब्ध चारा व कंसात महिन्याला लागणारा चारा (टनांत)
नगर ८७९६८ (६९८८६)
राहुरी १६११६२ (६९९५१)
श्रीरामपूर १०९४०२ (३३५८९)
पारनेर १६९०२० (७०२२१)
राहाता ३८९०० (३६५३९)
कोपरगाव ३३६२९ (३२८६०)
अकोले १९०१६३ (४६८२६)
श्रीगोंदा ४०२१८ (६४२२१)
कर्जत १३४४६९ (६४३३९)
जामखेड ३८६९१ (३४९९१)
पाथर्डी ६१७६७ (५६९२७)
शेवगाव १५३७१०(४७५३०)
नेवासा ४२३०० (७४०५८)
संगमनेर ७५८०८ (८८०८३)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.