
Agriculture News : गेल्या एक महिन्यापासून पाऊस नाही पिके जळू लागली आहेत. विहिरी आणि कूपनलिकांमध्ये जेमतेम पाणी आहे या पाण्यावर पिके जगविण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत आहेत. मात्र गेल्या आठ दिवसांपासून वीज वितरण कंपनीने अचानक लोडशेडिंग सुरू केले आहे. वीज केव्हाही येते आणि केव्हाही जाते.
याचा परिणाम बागायतदार शेतकऱ्यांच्या पिकांवर झाला आहे. आधीच पाऊस नाही, त्यात विजेच्या लपंडावाचा खेळ सुरू झाला आहे. अस्मानी संकटासह सुलतानी संकटामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. धुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. नियमित वीजपुरवठ्याची मागणी होत आहे.
धुळे जिल्ह्यामध्ये पावसाने दडी मारल्यामुळे मोठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पाऊस नाही. पिके करपत चालली आहेत. विहीर आणि कूपनलिका आटत चालल्या आहेत. जलपातळी घटत चालली आहे. बागायती पिके ही जगविण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
दिवसापेक्षा रात्री अधिक वीज दिली जात होती. आता विजेचाही लपंडाव सुरू झाला आहे. पिके कशी जगवावीत हा शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. किमान विहिरी आणि कूपनलिकेच्या पाण्यावर १५-२० टक्के हंगाम तरी येईल, अशी आशा बागायतदार शेतकऱ्यांना होती. ती आशाही आता फोल ठरत आहे.
दरम्यान, वीज वितरण कंपनीने रात्री का असेना पण पूर्णवेळ वीजपुरवठा करावा, अशी मागणी उद्योजक अरुण पाटील, शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष राजा पाटील, शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष आत्माराम पाटील, जिल्हा उपाध्यक्ष नारायण माळी, तालुकाध्यक्ष भगवान पाटील, जिल्हाध्यक्ष गुलाबसिंग रघुवंशी, युवराज पाटील, भागवत पाटील आदींनी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.