
यवतमाळ : गेल्या जुलै व ऑगस्ट या महिन्यांत झालेली अतिवृष्टी व पुराच्या पाण्याने पिकांची नासाडी (Crop Damage Due To Heavy Rain) झाली. उभ्या असलेल्या पिकांमधून हातात काही येईल, असे वाटत नाही. अतिवृष्टीत (Heavy Rain) पिकांसोबतच हंगामही हातून गेला आहे. दुबार व तिबार पेरणी (Re Sowing) केल्याने सगळ्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. आता मायाबाय सरकार, तुमचाच आधार आहे. नुकसानभरपाई (Crop Damage Compensation) मिळाल्यास किमान रब्बी हंगामातून (Rabi Season) आर्थिक तूट काही दूर केली जाईल. त्यामुळे आता शासनाकडून तत्काळ मदत द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्याकडून आहे.
जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यातील तीन लाख ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. संततधार पावसाने शेतकऱ्यांचे यंदा अतोनात नुकसान झाले. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाअभावी पेरलेले बियाणे उगवलेच नाही. परिणामी, शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पावसाच्या आशेने दुबार पेरणी करूनही काही शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना तिबार पेरणी करावी लागली. त्यातून कसेबसे सावरल्यानंतर पीक डोयालयला लागले. तर अतिवृष्टीने शेतकऱ्यांचा घात केला. जिल्ह्यातील ९० मंडळांत जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली. पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यात तब्बल तीन लाख १६ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. या पावसातून सावरत नाही, तोच ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाने हजेरी लावली.
संततधार पावसाने शेतातील पिके पाण्याखाली गेल्याने ७५ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यांचा अहवाल सादर झाला आहे. ऑगस्ट महिन्यातील पंचनामे अजूनही सुरू आहेत. जुलै व ऑगस्ट महिन्यांत झालेल्या पावसाने तब्बल तीन लाख ७५ हजार क्षेत्रावरील पीक बाधित झाल्याचा अहवाल कृषी विभागाचा आहे. त्यातील अनेक ठिकाणी यंदा पेरणी करणे शक्य नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा हंगाम हातून गेला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पेरणी केली. पीक आल्यानंतर कर्ज फेडू, अशी मानसिकता शेतकऱ्यांची होती. आता अशास्थितीत लावलेला खर्च निघणार की नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शासनाच्या भरीव निधीची गरज आहे.
निर्णय झाला, अंमलबजावणी कधी
राज्य शासनाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली आहे. मात्र अजूनही निकष व आदेश प्रशासनाला आलेले नाहीत. अशास्थितीत घोषणा करूनही कोणते शेतकरी पात्र ठरतील, अशी स्थिती आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
जुलै महिन्यातील स्थिती
बाधित शेतकरी-३,१०,२००
बाधित क्षेत्र-३,०१,६४४ हेक्टर
अपेक्षित निधी-२०५कोटी ११ लाख
ऑगस्ट महिना
बाधित शेतकरी-६१,७६२
बाधित क्षेत्र-७५ हजार हेक्टर
पीकनिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)
कापूस-१,८४,६०१
सोयाबीन-८७,११९
तूर-२९,२२२
ज्वारी-२८०
मुंग-९६.८०
उडीद-८५
भाजीपाला-२३२
तालुकानिहाय बाधित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
यवतमाळ-११३
कळंब-१४,१६६
घाटंजी-३०,७२४
राळेगाव-३५,७१६
दारव्हा-११२
नेर-२,५१८
आर्णी-२६,३९०
बाभूळगाव-५०९९
पुसद-१५५
दिग्रस-८१०
उमरखेड-३२,५९२
महागाव-२४,७२५
पांढरकवडा-३४,८७२
वणी-४४,२३९
मारेगाव-२५,७३७
झरी जामणी-२३,७३६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.