Latest Agriculture News : मॉन्सूनने केरळात दाखल झाल्याची अधिकृत घोषणा हवामानशास्त्र विभागाने गुरूवारी (ता.८) केली आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी मॉन्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. मात्र, खरीप हंगामाला सुरूवात झाली तरही रब्बी हंगामात झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे खरीपाची तयारी कशी करायचा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
यंदाच्या रब्बी हंगामामध्ये राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. राज्य सरकारने नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अद्यापही ही मदत मिळाली नाही.
मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीचा नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला होता. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सुमारे ८२ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या ४५ हजार हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले होते.
उत्तर महाराष्ट्रातील जवळपास दीड लाख शेतकरी अवकाळीमुळे बाधित झाले होते. अवकाळीमुळे नुकसान झालेले हे शेतकरी अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. खरीप तोंडावर आला तरी रब्बीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्याने शेतकरी मात्र संकटात सापडले आहेत.
एकीकडे शेतकऱ्याला मॉन्सूनच्या आगमानाची आस लागली आहे, तर तर दुसरीकडे रब्बीमध्ये झालेल्या नुकसानाच्या मगतीचीही शेतकरी वंचित राहिल्याचे चित्र आहे. मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचे नुकसान झाले होते.
अवकाळीमुळे कांदा, द्राक्ष यासह इतर शेतीमालाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानी भरपाई शेतकऱ्यांना अद्यापही मिळालेली नाही. मंत्र्यांसह अधिकाऱ्यांनीही नुकसानग्रस्त भागातील शेतीची पाहणी केली होती.
नुकसानाच्या पाहणीनंतर सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, शेतकऱ्यांना अजूनही कोणतीच मदत मिळाली नसल्याचे समोर आले आहे.
शेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतिक्षेत
अवकाळीमुळे नाशिक जिल्ह्यातील ८२ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. तर त्या खालोखाल नगर जिल्ह्यातील ४५ हजार शेतकरी आणि जळगाव जिल्ह्यातील १९ हजार शेतकरी बाधित झाले होते. या सर्व शेतकरी अजूनही सरकारच्या मदतीपासून वंचित आहेत.
एकूण उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विचार केल्यास जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही. उत्तर महाराष्ट्रात सुमारे ८० हजार हेक्टपपेक्षा जास्त क्षेत्र अवकाळीमुळे बाधित झाले होते.
दरम्यान, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पेरणीसह बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची गरज असून शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तात्काळ मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.