
उत्तूर, जि. कोल्हापूर : आजरा तालुक्यात आंब्याच्या झाडांना मोहोर (Mango Blossom) लागल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. थंडीमुळे हापूस (Hapus), पायरी आंबा व इतर प्रजातीच्या बागा बऱ्यापैकी मोहरल्या आहेत. बागा मोहरण्याचे प्रमाण काही ठिकाणी ६० टक्के तर काही बागांमध्ये ८० ते ९० टक्क्यांपर्यंत आहे. परंतु काही भागांत थंडीच न जाणवल्याने आंबा बागा मोहरण्याची प्रतीक्षा आहे.
ज्या बागा मोहरल्या तेथील आंबा साधारणतः मार्चअखेरीस किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बाजारात येण्याची शक्यता शेतकरी व तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. दरवर्षी साधारणतः डिसेंबर ते जानेवारीमध्ये आंब्याला मोहर लागतो. पुढे मोहोराचे रूपांतर फळात होते; मात्र, आंबा परिपक्व होईपर्यंत अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ढगाळ वातावरण निर्माण झाले की, मोहोर गळू लागतो.
लहान फळेदेखील पडू लागतात. त्यामुळे आंबा फळांचे भवितव्य निसर्गावर अवलंबून आहे. आजरा तालुक्यात डोंगराळ भागात नैसर्गिक पद्धतीने आंब्याचे पीक घेतले जाते तर काही ठिकाणी खतांचाही पुरेसा वापर केला जातो. निसर्गाच्या लहरीपणामुळे गतवर्षी आंब्याचे पीक अपेक्षित आले नाही.
यावर्षी मध्यंतरी पडलेल्या थंडीमुळे आंब्याची मोहोर बहरल्याचे चित्र दिसत आहे. दोन वर्षात चक्रीवादळ, बदलते हवामान, अवकाळी पाऊस याप्रमाणे लहरी निसर्गाचा फटका बसल्यामुळे सामान्यांना आवाक्याबाहेर राहिलेला आंबा यंदा सर्वांचे तोंड गोड करण्याची चिन्हे दिसत आहेत.
आंब्याच्या झाडांना चांगला मोहोर दिसून येत असल्याने यंदा चांगले पीक येण्याची शक्यता आहे.
- शिवाजी गडकरी, कृषी सहायक, बहिरेवाडी.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.