Hingoli News : कुरुंदा (ता. वसमत) येथील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या रविवारी (ता. ६) झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत थकित ‘एफआरपी’ रक्कम तत्काळ देण्यात यावी या मागणीसाठी शेतकरी सभासदांनी अध्यक्षासह पदाधिकारी, कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर अध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांच्या वाहनास घेराव घालण्यात आला. शेतकरी सभासदांच्या संतप्त भावना लक्षात घेता कारखाना प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर शेतकरी शांत झाले.
टोकाई कारखान्याच्या विविध प्रश्नांबाबत तसेच नवीन सभासद संख्या वाढवणे, गाळप क्षमतेत वाढ करण्याच्या निर्णयासाठी रविवारी कारखान्यावर विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली.
या वेळी कारखान्याचे अध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव यांच्यासह संचालक सुनील बागल, मनोज कनेवार, विलासराव नादरे, शिवाजी सवंडकर, गजानन जाधव, साहेबराव पतंगे यांच्यासह संचालक उपस्थित होते.
या वेळी कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता १२५० टनांवरून २५०० टन करण्याचा मुद्दा मांडला. मात्र थकित ‘एफआरपी’ अदा करण्याच्या मुद्द्यावरून शेतकरी सभासद संतप्त झाले.
आधी ‘एफआरपी’ची रक्कम द्यावी त्यानंतर काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा अशी भुमिका शेतकऱ्यांनी घेतली.मात्र यावेळी गाळप क्षमता वाढविण्यासोबत इतर निर्णय झाले. या सभेनंतर ॲड. जाधव व संचालकांच्या वाहनांस घेराव घालण्यात आला.
ॲड. जाधव यांनी ‘एफआरपी’ची थकित असलेल्या रकमेपैकी ७५ टक्के रक्कम ३१ ऑगस्टपर्यंत तर उर्वरित रक्कम टप्प्याटप्याने देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.