
Pune News : पर्यावरणपूरक विकासाला राज्य शासनाचे प्राधान्य असून, राज्याला लाभलेल्या सह्याद्री पर्वतरांगा, समुद्रकिनारे आणि पश्चिम घाट हा पर्यावरणाचा ठेवा जतन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
तसेच कांदळवनाच्या जतन आणि संवर्धनात महाराष्ट्र आघाडीवर असून, राज्यात १८ नवीन आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव वनक्षेत्रे घोषित केली आहेत.
नागरी जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते ‘माझी वसुंधरा ३.०’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, आमदार संजय गायकवाड, आमदार राजेंद्र राऊत, पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, स्वित्झर्लंडचे उच्चायुक्त मार्टिन मेयर, यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी- अधिकारी उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत उत्तम कामगिरीबद्दल पुणे महसूल विभाग राज्यात पहिल्या क्रमांकाचा विभाग ठरला आहे. त्याशिवाय विविध गटांतून एकूण ८ पुरस्कार पुणे जिल्ह्याला प्राप्त झाले. यामध्ये अमृत गट (राज्यस्तर) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला पहिला क्रमांकाचा आणि पुणे महानगरपालिकेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच गटात भूमी थिमॅटिकमधील उत्तम कामगिरीचा पुरस्कार पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेला प्रदान करण्यात आला.
नगर परिषद व नगर पंचायत गटअंतर्गत राज्यस्तरावर लोणावळा परिषदेला दुसऱ्या आणि बारामती नगर परिषदेला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या गटात भूमी थिमॅटिकमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार लोणावळा नगर परिषदेला जाहीर झाला.
याच गटात विभागस्तर पुरस्कारांतर्गत पुणे विभागात तळेगाव दाभाडे नगर परिषदेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर १५ हजार लोकसंख्या गटात माळेगाव बु. (ता. बारामती) या नगर पंचायतीला राज्यस्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केला.
सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यासाठीचा राज्यस्तरावरील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार पुणे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला. सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात डॉ. राजेश देशमुख (पुणे), रूचेश जयवंशी (सातारा) आणि राहुल रेखावार (कोल्हापूर) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले. तर सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गटात जितेंद्र डुडी (सांगली), आशिष येरेकर (नगर) आणि आशिमा मित्तल (नाशिक) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.