
इंदापूर : ‘‘गेल्या काही वर्षांपासून शेतकरी अडचणीत येत असताना राज्यातील सरकारने या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योग्य पावले उचलणे गरजेचे आहे. मध्य प्रदेशाच्या धर्तीवर सरकारने वीजबिल माफी (Electricity Bill waive) करावी,’’ अशी मागणी आमदार दत्तात्रेय भरणे (Dattatray Bharane) यांनी केली.
इंदापूर तालुक्यामध्ये थकीत वीज बिलाअभावी अनेक शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भरणे यांनी वीज कंपनीचे अधिकारी व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक नुकतीच घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
भरणे म्हणाले, ‘‘सध्या शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देताच त्यांचे वीजजोड तोडले जात आहेत. येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न मांडला जाईलच. परंतु सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण वीजबिल माफी करावी, अशी आमची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असून, या ठिकाणी उपस्थित अधिकाऱ्यांनी त्या सरकारपर्यंत कळवाव्यात. एक बिल भरणे कोणालाही मान्य नाही. त्यामुळे शेतकरी कायदा हातात घेतील आणि मोठे आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल.’’
काही गावांतील नागरिकांनी आमच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे जोड तोडल्याचे बैठकीत सांगितले. त्या वेळी भरणे यांनी आक्रमक होत पिण्याचे पाणी तोडाल तर याद राखा, गाठ माझ्याशी आहे, असा दम भरला. यापुढे पिण्याच्या पाण्याचा वीजजोड पुरवठा खंडित केला जाणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.