
Sangli News : टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना भर पावसाळ्यात सुरू करण्याची वेळ यावर्षी आली. वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात द्यावे, या मागणीला प्रशासनाने प्रतिसाद दिला.
तोच निर्णय आज या भागाला तारणारा ठरला. या भागातील द्राक्ष, ऊस, भाजीपाला, डाळिंबासह जनावरांवर व माणसांवर पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली असती परंतु फक्त योजना सुरू झाल्या म्हणून हा भाग तरला आहे.
‘पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवू’ ही घोषणा अनेक राज्यकर्त्यांनी केली. आजही अनेकजण निवडणुका आल्या की त्यावर मोठे भाषण देत असतात. यावर्षी मात्र हे पाणी वळवणे किती गरजेचे होते, याची जाणीव झाली आहे. ऐन पावसाळ्यात टंचाईचे मोठे संकट उभे राहिले आहे.
मिरज पूर्व भाग, कवठे महांकाळ, तासगाव, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव या सगळ्या तालुक्यांत सध्या पाण्याची प्रचंड समस्या निर्माण झाली आहे. पाऊस अजिबात नाही. खरिपाची पेरणी झालेली नाही. जी झाली ती वाया गेली आहे.
उन्हाळ्याप्रमाणे उन्हाचा चटका बसतो आहे. या स्थितीत द्राक्ष, ऊस, भाजीपाला, डाळिंब पिके जगवण्याचे आव्हान आहे. अशावेळी उन्हाळ्यात जसे आवर्तन चालवावे त्या पद्धतीने पाटबंधारे विभागाने योजना सातत्यपूर्ण चालवल्या आहेत. त्याचा या भागाला फायदा होतोय.
परतीचा पाऊस तारेल
आता सगळ्या अपेक्षा या परतीच्या पावसावर आहेत. मुख्यत्वे या भागात परतीचा पाऊस चांगला होता. परंतु, जिल्ह्याच्या अन्य भागात मॉन्सूनचा पाऊसच झालेला नसल्याने परतीच्या पावसाबाबत आडाखे बांधणे कठीण झाले आहे. परतीच्या पावसाने चकवा दिल्यास यावर्षी तीव्र दुष्काळाचे संकट दाटू शकते आणि ते आव्हान कठीण असेल.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.