
Sangli News : टंचाईग्रस्त तालुक्यांसाठी ताकारी उपसा योजनेचे यंदा पावसाळ्यात सुरू झालेले पाणी आवर्तन कडेगाव व खानापूर तालुक्यातील लाभक्षेत्राची तहान भागवून सध्या तासगाव तालुक्यातील मुख्य कालव्याच्या १०५ किलोमीटरवर वंजारवाडीजवळून वाहत आहे.
हे पाणी मागणीनुसार मुख्य कालव्याच्या शेवटी १४४ किलोमीटरवर सोनी (भोसे) या मिरज तालुक्यातील गावांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.
‘ताकारी’चे हे पाणी २३ जुलैला सुरू झाले असून, बारमाही पिकांसह उन्हाळी शेतीला या पाण्याचा फायदा होत आहे. सुरुवातीचे दहा दिवस कडेगाव तालुक्यातील सिंचन क्षेत्राला पाणी दिल्यानंतर पाण्याने खानापूर तालुक्याचीही तहान भागविली व आता वंजारवाडीजवळून वाहत आहे. या पाण्याने ऐन पावसाळ्यात पिण्यासाठी व लाभक्षेत्रातील पिकांना चांगलाच दिलासा दिला आहे.
दरम्यान, लांब पल्ल्यावर गेल्यावर मुख्य कालव्यातील पाण्याचा दाब भरपूर राहावा, यासाठी टप्पा १ आणि २ वरील प्रत्येकी १० पंप सुरू करण्यात आले आहेत. शिवाय टप्पा ३ वरील २ व टप्पा ४ वरील २ पंपांचे पाणी सोनहिरा खोऱ्यातील सिंचनक्षेत्रासाठी सोडण्यात आले आहे. ते पुढे तडसर भागातही जात असते.
या पाण्याचा लाभ बारमाही बागायती शेतीसह कडेगाव, खानापूर, पलूस आणि तासगाव तालुक्यातील बऱ्याच गावांच्या पाणीपुरवठा योजनांना होतो. या वर्षी पावसाने या भागाला आजतागायत दिलेल्या हुलकावणीमुळे सर्वत्र जमिनीतील पातळी खालावून पाणीप्रश्न बिकट झाला होता. परिणामी, शेतीला पाणी कमी पडून अंशतः पिके करपली होती. मात्र ताकारी सुरू झाल्याने सध्यातरी मुबलक पाणी झाले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.