Akola News : गेल्या १५ दिवसांपासून अनेक भागांतील पाऊस गायब असल्याने पिकांना ताण बसू लागला आहे. सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात, तर कपाशीचे वाढीच्या स्थितीत आहे. या काळाता पिकांना ओलाव्याची नितांत गरज आहे. सिंचनाची सोय असलेले शेतकरी पिकाला पाणी देण्याची धडपड करीत आहेत.
जिल्ह्यात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस झाला होता. त्यानंतर आता जवळपास १५ दिवसांमध्ये पाऊस झालेला नाही. या वर्षी असमतोल स्वरूपाचा पाऊस झाल्याने अनेक तालुक्यांत पावसाची सरासरी कमी आहे. बुलडाणा जिल्ह्यात घाटावरील बुलडाणा, चिखली, मेहकर, देऊळगावराजा अशा तालुक्यांत पावसात घट आहे.
तर याच जिल्ह्यात दुसरीकडे मलकापूर, संग्रामपूर, जळगाव जामोद, शेगाव, नांदुरा अशा तालुक्यांत सरासरी ओलांडली. अकोल्यातही अकोट तालुका पिछाडीवर आहे. वाशीम जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झालेला आहे. आता खंड पडल्याने सर्वच भागांत पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली आहे.
तेल्हारा तालुक्यात मागील महिन्यात १९ जुलैला ढगफुटीसदृश पावसामुळे तालुक्यात शेती पिकांचे नुकसान झाले होते. त्या दिवसापासून मुबलक पाऊस नाही. पाऊस लांबल्याने शेतातील पिके दुपारच्या काळात सुकत आहेत.
शेतकऱ्यांनी प्रामुख्याने सोयाबीनला तुषार सिंचन सुरू केले. पावसाने दडी मारल्याने फुलोऱ्यातील सोयाबीन पिकाला फटका बसू शकतो. बागायतदार शेतकरी शेतातील पीक वाचविण्यासाठी रात्रीबेरात्री शेतात जाऊन पाणी देत आहेत. या आठवड्यात पाऊस न आल्यास शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.