Kharif Crop : जेमतेम उगवले ते पावसाअभावी करपले

Kharif Rain Update : दर वर्षी जुलैअखेर खरिपाच्या पेरण्या होणे अपेक्षित असते. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने अवघ्या ५० टक्के पेरण्या झाल्या आहेत.
Kharif Crop
Kharif CropAgrowon

Sinnar News : तालुक्यात यंदा सरासरीच्या निम्माही पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. दर वर्षी जुलैअखेर खरिपाच्या पेरण्या होणे अपेक्षित असते. मात्र, पावसाने हुलकावणी दिल्याने अवघ्या ५० टक्के पेरण्या झाल्या आहेत. पावसाअभावी मका, सोयाबीनसह चाऱ्यासाठी पेरणी केलेले ज्वारीचे पीक अक्षरश: करपले आहे.

सिन्नर तालुक्यात जूनमध्ये सरासरीच्या ४७ टक्के, जुलैत ६१, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवघा दहा टक्के पाऊस झाला. कोरडवाहू क्षेत्र सर्वाधिक असलेल्या पूर्व भागातील पावसाचे प्रमाण नगण्य राहिल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यंदाच्या हंगामात सुरवातीपासूनच पावसाने दडी मारली. अधिक पावसाचे मानले जाणारे सिन्नर, पांढुर्ली, डुबेरे, सोनांबे, नायगाव या कृषी मंडलांमध्ये जेमतेम पाऊस झाला.

Kharif Crop
Kharif Crops Damage : उन्हाच्या तडाख्याने खरिप हंगाप धोक्यात, लोकरी माव्याचा उसावर हल्ला

देवपूर, वावी, शहा, नांदूर, वडांगळी, पांगरी, गोंदे या मंडलांमध्ये पाऊसच नसल्यामुळे संपूर्ण तालुक्याची चिंता वाढली आहे. तालुक्यातून वाहणारी सर्वांत मोठी देव नदी अद्याप प्रवाहित झालेली नाही. भोजापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न पडल्याने धरण निम्म्यापेक्षा रिकामे आहे. १५ ऑगस्टपर्यंत तालुक्यातील सर्वच लहान-मोठी धरणे, बंधारे, साठवण तलावांमध्ये आश्वासक साठा असतो.

Kharif Crop
Crop Damage : मोहोळ तालुक्यातील पिके पावसाअभावी कोमेजताहेत

सर्वत्र नदी-नाल्यांना पाणी वाहत असते. यंदा परिस्थिती विषम असून, खरीप हंगाम संपूर्णतः वाया गेला आहे. सिंचन सुविधा असलेल्या भागात खरीप पिकांचे अपेक्षित उत्पन्न निघणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण वातावरण बदलाचा परिणाम पिकांवर झाल्याचे पाहायला मिळते. पूर्व भागात सुरवातीपासूनच परिस्थिती प्रतिकूल आहे. यापूर्वीही दुष्काळाचे सर्वाधिक चटके पूर्व भागाला बसले आहेत. चारा आणि पिण्याच्या पाण्याचे दुर्भीक्ष जाणवायला सुरुवात झाली आहे.

५१.१२ टक्के पेरणी

कृषी विभागाकडून प्राप्त आकडेवारीनुसार सिन्नर तालुक्यात यंदा खरिपाच्या अवघ्या ५१.१२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. त्यात भातलागवड ३५ टक्के, बाजरी ६.६७ टक्के, मका ६३.१५ टक्के, सोयाबीन ९९.२५ टक्के, कपाशी ४.५० टक्के, तूर ९.४३ टक्के, मूग २३ टक्के, उडीद १३ टक्के याप्रमाणे पेरणी झाली. जूनमध्ये झालेल्या पावसावर पेरण्या झाल्या. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिकांना ताण पडला आहे. सर्वच ठिकाणी पिके करपली. या पिकांचा चाऱ्यासाठीही उपयोग होणार नाही, अशी परिस्थिती आहे.

तालुक्यातील पर्जन्यमान, खरीप हंगामातील पेरणी अहवालाबरोबरच पंचायत समिती स्तरावरून टंचाई आराखडा शासनास सादर केला आहे. ज्या गावांमध्ये पाणीप्रश्न भेडसावेल, तिथे टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. पशुधनास पाणी आणि चाऱ्याबाबत अद्याप कोणतीही मागणी आलेली नाही. मागणी येईल, त्यानुसार शासनाकडे पाठपुरावा करून आवश्यक ती मदत करण्यात येईल. भविष्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे सोयी-सुविधा पुरविण्याचे नियोजन केले जाईल.
-सुरेंद्र देशमुख, तहसीलदार, सिन्नर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com