Solapur News : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने व कडक उन्हामुळे उगवून आलेली पिके कोमेजू लागली आहेत. तर ऊस लागवडीही खोळंबल्या आहेत. पाऊस नाही पडला तर पेरणीसाठी केलेला खर्च वाया जातो की काय, अशी भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
तालुक्यातील खरीप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, चालू खरीप हंगामात एकूण १७ हजार ११५ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, गळीत धान्य व तृणधान्याची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षीपेक्षा चालू खरीप हंगामात दीड हजार हेक्टरवर जादा पेरणी झाली आहे. त्यात सर्वात जास्त सोयाबीनची ८ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
गेल्या हंगामात १६ हजार ६४४ हेक्टरवर पेरणी झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अतुल पवार यांनी दिली. दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने पिकांवर संकट घोंगावत आहे.
मोहोळ तालुका तसा रब्बीचा तालुका. मात्र उजनी डावा कालवा, आष्टी उपसा सिंचन योजना, आष्टी तलाव व विविध नद्या या पाण्याच्या स्रोतामुळे बागायती क्षेत्र विस्तारले आहे. त्यात ऊस व विविध फळबागांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून चारा टंचाईमुळे जमिनीवर उभा असलेला
ऊस मोठ्या प्रमाणात चाऱ्यासाठी विकला गेला आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी थोडासा पाऊस झाल्याने व पुढेही आता पडेल, या विश्वासाने अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात चाऱ्यासाठी मक्याची पेरणी केली आहे. ती अद्यापही सुरूच आहे. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी दुधाचा व्यवसाय करतात. त्यामुळे मका हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.