
Mumbai News : ‘‘राज्यात केवळ १. ६९ टक्के पेरण्या झाल्या आहेत. आता काही भागात पाऊस सुरू झाला असला तरी जुलैमध्ये पाऊस रोडावण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटाला राज्याला सामोरे जावे लागू शकते. त्याची तयारी करा. शिवाय शेतकऱ्यांनी पेरणीसाठी गडबड करू नये, यासाठी त्यांना मार्गदर्शन करा,’’ अशा सूचना मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार यांनी खरिपाचा अहवाल सादर केला. यात सध्या होत असलेला पाऊस पेरण्यांसाठी पोषक आहे. शेतकऱ्यांना योग्य सल्ला देण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जूनच्या शेवटच्या तारखेपर्यंत पाऊस होऊ शकतो. जुलैमध्ये कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेशाकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाबाबत संदिग्धता आहे, अशी माहिती त्यांनी बैठकीत दिली.
उशिरा सुरू झालेला मॉन्सूनचा पाऊस आणि पूर्व विदर्भात, मराठवाड्यात तो न अवतरल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या नाहीत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट आहे. यामध्ये १ ते २१ जूनपर्यंत राज्यात केवळ १६. ७ टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या ११. ५ टक्के पेरण्या झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.
राज्यात बहुतांश ठिकाणी भात आणि नाचणीच्या धूळवाफ पेरण्या झाल्या आहेत. तसेच बागायती क्षेत्रात कापूस, भात, मका पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. जूनअखेरच्या आठवड्यात केवळ कोकणातील काही भागात पाऊस झाला आहे.
राज्यातील अन्य ठिकाणी समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी पेरणीबाबत द्विधा मनःस्थितीत आहेत. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र, त्या पावसाअभावी वाया जाऊ शकतात. कोकणातील झालेल्या पेरण्यात उगवण नीट होईल की नाही याबाबत साशंकता आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार जुलैच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे. पाऊस रोडावल्यास पिके वाया जाऊन दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. तसेच डाळवर्गीय पिकांसाठी लांबलेला पाऊस धोकादायक आहे. लागवडीखालील क्षेत्रही कमी होण्याचा धोका आहे. या सर्व बाबींवर मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मंत्र्यांनी चर्चा केली.
पेरण्यांची गडबड करू नये
श्री. अनुपकुमार म्हणाले, ‘‘कृषी विभागाचे कर्मचारी बोगस बियाणे, खते यांच्यावर नजर ठेवून आहेत. संशयास्पदरीत्या बियाणे आणि खते सापडत आहेत, तिथे कारवाई सुरू आहे. १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नयेत, असे आवाहन केले आहे.
विदर्भ, मराठवाडा, खानदेशावर संकट ?
जुलै महिन्यात अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुलैमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील अशी चिंता मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त करण्यात आली. याचा फटका विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला बसेल, अशी भीतीही व्यक्त केली. या भागात दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता गृहीत धरून नियोजन करा, अशी सूचना कृषी विभागाला देण्यात आली.
खते, बियाण्यांची उपलब्धता तपासा
बियाणे आणि खतांची उपलब्धता तपासा, खतांचा काळाबाजार होणार नाही, याची काळजी घ्या, प्रमाणित बियाण्यांचे वितरण होईल, यावर कटाक्ष ठेवा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
२० जिल्ह्यांत अत्यंत कमी पाऊस
महाराष्ट्रात आतापर्यंत १८९. ५ मिलिमिटर पाऊस अपेक्षित होता. मात्र, प्रत्यक्षात हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार ८३. ९
मिलिमीटर पाऊस पडला आहे. ५६ टक्के पाऊस कमी पडला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत अद्याप पाऊस नाही. ३६ जिल्ह्यांपैकी एका जिल्ह्यात पाऊस सर्वाधिक पडला आहे. २० जिल्ह्यांत अत्यंत कमी पाऊस पडला आहे. १३ जिल्ह्यांत कमी आणि दोन जिल्ह्यांत सामान्य पाऊस झाल्याचे हवामान खात्याने नमूद केले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.