
Maharashtra Politics News Live Updates : ‘‘महाराष्ट्रात गेल्या चार वर्षात तीन सरकारे स्थापन झाली. ही सरकारे स्वतःच्या स्वार्थासाठी राबविली आहेत. तेलंगणामध्ये भारत राष्ट्र समितीचे गेली आठ वर्षे के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखालील एकच सरकार काम करत आहे. हे सरकार शेतकऱ्यांसह सर्वसामान्य हिताच्या योजना राबवीत असल्याने लोकप्रिय ठरले आहे.
यामुळे महाराष्ट्रातील अनेक सर्वसामान्य कार्यकर्ते ‘बीआरएस’कडे आकर्षित होत आहेत. बीआरएस महाराष्ट्राला प्रभावी पर्याय देईल. यासाठी आम्ही २८८ विधानसभा मतदारसंघात काम करीत आहोत,’’ अशी माहिती ‘बीआरएस’चे प्रदेशाध्यक्ष माणिक कदम आणि समन्वयक बी. जे. देशमुख यांनी मंगळवारी (ता.४) पत्रकार परिषदेमध्ये दिली.
ज्येष्ठ लोककलावंत सुरेखा पुणेकर, ऊस तोडणी कामगार नेते बाळासाहेब सानप या वेळी उपस्थित होते. कदम म्हणाले,‘‘महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत झालेल्या राजकीय नाट्यामुळे सर्वसामान्य मतदार आणि तरुण चिडलेला आहे. अनेक गावांमध्ये मतदार कार्ड जाळण्याचे आंदोलने झाली. ही आंदोलने लोकशाहीवरील विश्वास उडाल्याचे प्रतीक आहे. तरूणांनी बीआरएस मध्ये सहभागी व्हावे.’’
बी. जे. देशमुख म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात एकमेकांवर आरोप करणारेच सर्व एका सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. हा मतदारांचा विश्वासघात आहे. सध्या महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या पक्षांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते आणि नेते संभ्रमात असून त्यांची कुंचबणा होत आहे. त्यांना बीआरएस चांगला पर्याय आहे. महाराष्ट्रात बीआरएस पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार स्थापन करेल.’’
‘नेत्यांनी तमाशात काम करावे’
‘‘गेल्या चार वर्षात महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारणाचा तमाशा फड सुरू केला आहे. खर तर या नेत्यांनी तमाशा फडात कलाकार म्हणून काम केले पाहिजे,’’ अशी टीका ज्येष्ठ लावणी कलाकार सुरेखा पुणेकर यांनी केली. पुणेकर यांनी नुकताच ‘बीआरएस’मध्ये प्रवेश केला आहे.
त्या म्हणाल्या, ‘‘मी पक्ष प्रवेश करण्याअगोदर १० दिवस तेलंगणाच्या खेड्यापाड्यात फिरले. त्याठिकाणी सरकारने विविध योजनांचा केलेला दावा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी याचा अभ्यास केला. शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेशी बोलूनच मला सरकारबाबत विश्वास निर्माण झाल्यावर पक्षप्रवेश केला आहे.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.