Nashik Onion Production : उन्हाळ कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली सातत्याने भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यात गेल्या काही दिवसात काहीशी सुधारणा आहे. मात्र अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांचा संताप कायम आहे.
या पार्श्वभूमीवर भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) नेते व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणा बाजारात महाराष्ट्रापेक्षा अधिक दर मिळत असल्याचे व्हिडिओद्वारे वारंवार सांगितले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा हैदराबाद बाजारात पाठवला.
मात्र येथे मिळणारा दर हा प्रत्यक्षात महाराष्ट्रापेक्षा अधिक नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यामुळे ‘बीआरएस’च्या प्रचारी राजकारणात कांदा उत्पादकांची फरपट होत असल्याची परिस्थिती आहे.
तेलंगणातील अनेक बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक ही जेमतेम होत असते. प्रभात बाजारात कांद्याची आवक सर्वाधिक असते. तर याशिवाय बोवनपल्ली, देवरकाद्रा, गुडूमलकापूर, सदाशिव पेठ, संगारेडी येथेही कांद्याची आवक होते.
मात्र महाराष्ट्राच्या एकूण अवकेच्या तुलनेत आवक १० टक्क्यांच्या आत आहे. प्रामुख्याने तेलंगणाच्या सीमा भागातील राज्यातील शेतकरी हे कांदा विक्रीसाठी जातात. मागणीत वाढ झाल्यानंतर दराचा फायदा होतो.
आता हर्षवर्धन जाधव यांच्या व्हिडिओतील दाव्यानुसार छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, जळगाव व नाशिक जिल्ह्यांतील काही शेतकरी कांदा घेऊन हैदराबाद बाजारात गेले. त्यांना फायदा तर दूरच मात्र राज्यातील दरापेक्षा कमी दर मिळाला. त्यामुळे प्रत्यक्षात चांगल्या प्रतवारीच्या कांद्याला ११०० ते १२०० रुपये दर मिळाला.
तर काहींना गुणवत्तापूर्ण निर्यातक्षम माल असतानाही १५०० च्या आत दर मिळाले. त्यामुळे मिळणारा दर व झालेला खर्च यांची तुलना केल्यास प्रत्यक्षात शेतकऱ्यांना महाराष्ट्रात मिळणाऱ्या सरासरी दराच्या खाली दर मिळत असल्याची एकंदरीत स्थिती आहे. त्यामुळे या ठिकाणी नेऊन फायदा तरी काय, असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.
त्यामुळे हर्षवर्धन जाधव यांच्या दाव्यावर आता टीका होऊ लागली आहे. कांद्याची होणारी आवक देशावर असलेली मागणी व पुरवठा व निर्यात यावरच कांद्याचे दर निश्चित असतात मात्र असे असतानाही जाधव यांनी हे दावे कोणत्या धर्तीवर केले हे अनुत्तरीत आहे.
हैदराबादच्या बाजारातील ही आहे दर स्थिती :
हैदराबाद बाजारात कांद्याच्या कांदा क्रमांक १ व कांदा क्रमांक २ अशा दोन वर्गवारीत गोण्यांमधून आवक झाल्यानंतर लिलाव होतात. तेलंगणा सरकारच्या कृषी पणन विभागाच्या माहितीनुसार २१ ते २८ जूनदरम्यान कांदा बाजाराचा आढावा घेतल्यास १५ हजार क्विंटलच्या आत सर्वाधिक कांद्याची आवक दैनंदिन झाली आहे.
या बाजारात कांद्याला किमान ४०० रुपये ते कमाल १९०० रुपये दर मिळाले आहेत. तर सरासरी ११०० ते १२०० रुपये आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.