
चांदूररेल्वे, जि. अमरावती : तालुक्यातील शिरजगाव कोरडे येथील काही शेतकऱ्यांना शेतात (Farm Road) जायला रस्ता नसल्याने त्यांना शेती (Agriculture) करता येत नाही. बाजूच्याच शेतकऱ्यांनी मंजूर रस्त्याचे काम बंद पाडल्याने २०१७ पासून तर आतापर्यंत या शेतकऱ्यांना शेतात जायला रस्ताच नसल्याने त्यांची शेती पडीक राहत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे. यासंदर्भात प्रशासनाने काहीतरी पर्यायी मार्ग काढावा, यासाठी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
विनोद गावंडे, मालू कोरडे, संतोष राऊत, अक्षय रोकडे, दिलीप सोमवंशी, संजय बनसोड, किशोर बेलसरे यांना त्यांच्या शेतात जाण्याकरिता हक्काचा रस्ता नसल्याने शेताची वहिवाट करण्यासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज करून शिव पांदण रस्ता मंजूर करून घेतला होता. त्याला मंजुरी मिळून लोकसहभागातून रस्त्याचे कामही सुरू झाले होते.
रस्त्यावरील झाडे कटाई करून त्यापासून मिळालेला पैसाही या रस्त्यावर खर्च करण्याचे आदेश शासनाने दिले होते. परंतु त्याच परिसरातील शेतकऱ्यांनी या रस्त्याबाबत हरकत घेत काम बंद पाडले. तेव्हापासून अर्जदार शेतकरी शासनाचे उंबरठे झिजवत न्यायाची व रस्त्याची मागणी करीत आहेत.
प्रशासन मात्र कोर्टाचे कारण पुढे करीत हात वर करीत आहे, अशा परिस्थितीत अर्जदार शेतकरी एक एक वर्ष मोजत आहेत. दरवर्षी कोणाच्या तरी शेतातून जाऊन शेती वाहत आहेत. परंतु पाहिजे तशी मशागत करता येत नसल्याने शेतीचा पोत खराब होत आहे. अशा परिस्थितीत आता न्याय कोणाला मागावा, असा प्रश्न त्या शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.