
Pune News : ‘ग्राम जलआराखडा निर्माण करणे’ हा वर्तमान प्रकल्प सहज जलबोध अभियान आणि उन्नत भारत योजना याचा संयुक्त परिपाक आहे. यात डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्रामविकास केंद्र आणि सहज जलबोध अभियानांतर्गत राज्यातील २०० गावांचे जलआराखडे तयार करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे, अशी माहिती सहज जलबोध अभियानाचे मार्गदर्शक उपेंद्र धोंडे यांनी दिली.
पुण्यातील गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संशोधन संस्थेतील डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्रामविकास केंद्र आणि सहज जलबोध अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्राम जल आराखडा निर्माण करणे’ प्रकल्पाचे उद्घाटन गोखले इन्स्टिट्यूटचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांच्या हस्ते शनिवारी (ता.९) झाले. या कार्यक्रमात महाराष्ट्र विकास केंद्राचे संस्थापक अध्यक्ष अनिल पाटील हे अध्यक्षस्थानी होते.
कार्यक्रमप्रसंगी अॅड प्रभाकर तावरे-पाटील, गुरुदास नूलकर, सहज जलबोध अभियानाचे समन्वयक मयूर बागूल, विश्वास सूर्यवंशी, शैलेंद्र पटेल, प्रशांत राऊळ, राहुल घोलप, प्रीतेश बरे, उल्हास टकले आदी यावेळी उपस्थित होते.
श्री धोंडे म्हणाले, की नॉलेज-कॉलेज-व्हिलेज या अभिनव प्रयोगातून ग्रामजलचा आराखडा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प यशस्वी करण्याचे उद्दिष्ट निसर्गरक्षकांपुढे आहे. हा प्रकल्प डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्रामविकास केंद्राचे समन्वयक प्रा. कैलास बवले यांच्या नेतृत्वाखाली पार पाडला जाणार आहे.
या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी सध्या ३२ महाविद्यालये आणि १४५ गावांनी नोंदणी केलेली आहे. येत्या १५ आक्टोबरपर्यंत नोंदणी खुली आहे. जलयुक्त शिवार व तत्सम योजनांसाठी मार्गदर्शक वाटणाऱ्या गावांचादेखील या प्रकल्पात स्वागत आहे.
या प्रकल्पातून उपलब्ध होणारी माहिती संकलित करून ती शासनाकडे पाठविली जाणार आहे, असेही ते म्हणाले. उद्घाटन कार्यक्रमात गोखले इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी संकेत व सलोनी यांनी सूत्रसंचालन केले, तर सहज जलबोधतर्फे पुष्कर कुलकर्णी यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.