
कुंडल, जि. सांगली ः जगभरात झालेल्या अनेक क्रांती (Revolution) फसल्या; मात्र जी. डी. बापू लाड (G. D. Bapu Lad) यांच्या प्रगल्भतेमुळे येथील क्रांती यशस्वीपणे उभी राहिली. बापूंची मूल्ये घेऊनच पुन्हा एकदा क्रांती करावी लागेल, असे विचार पद्मश्री गणेश देवी (Dr. Ganesh Devi) यांनी व्यक्त केले.
कुंडल येथे रविवारी (ता. ४) क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते क्रांतिअग्रणी पुरस्कार स्वीकारताना ते बोलत होते. आमदार अरुण लाड, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, ॲड. प्रकाश लाड, उद्योजक उदय लाड, दिलीप लाड, क्रांती दूध संघाचे अध्यक्ष किरण लाड, जिल्हा परिषद सदस्य शरद लाड प्रमुख उपस्थित होते. रोख १ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
डॉ. देवी म्हणाले, ‘इतिहासात क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्यासारखी व्यक्ती जन्माला यावी आणि त्यांचा नावाचा शंभराव्या जयंतीदिनी क्रांतिअग्रणी पुरस्कार मला मिळाला, हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. तळहातावर शिर घेऊन बापू केवळ मूल्यांसाठीच लढले. देशात आपले पैसे लुटून आपलेच अधिकार काढून घेत असतील, तर बापूंनी दिलेला लढा पुन्हा उभारावा लागेल.’
खासदार पाटील म्हणाले, की जी. डी. बापू अखेरपर्यंत संघर्षमय जीवन जगले. डॉक्टर म्हणजे नाडी ओळखणारा माणूस, मग ती आयुर्वेदातील असो अथवा शिक्षणातील किंवा समाजातील, पण समाजाची नाडी ओळखणारे बापू होते. क्रांती कारखान्याची उभारणी ही अतिशय संघर्षातून झाली आहे.
आमदार अरुण लाड म्हणाले, की आपल्या माणसांचे कौतुक व्हावे, असे बापूंना नेहमी वाटत होते. बापूंच्यानंतर राजकीय व्यक्तींना पुरस्कार न देता सर्वसामान्यांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा बसवल्याशिवाय क्रांतिअग्रणी बापूंच्या स्मारकाचे उद्घाटन होणार नाही, असे सांगितल्यावर क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास शासनाकडून निधी प्राप्त झाला.
बापूंचे स्मारक प्रेक्षणीय स्थळ होईल. सर्वसामान्यांना अन्न, शिक्षण, रोजगार मिळाला पाहिजे, ही भूमिका होती. ज्यांनी देशासाठी काहीही केले नाही, ते देशातील महापुरुषांचे वाभाडे काढत आहेत. महापुरुषांबद्दल वाभाडे काढणाऱ्यांना वेळीच थांबवले पाहिजे.
या वेळी सुरेखा देवी, प्रमिला लाड, सुनंदा लाड, रणजित लाड, विक्रांत लाड, सुभाष पवार, रत्नदीप लाड, डॉ. प्रताप लाड, चंद्रकांत गव्हाणे, मारुती शिरतोडे, वसंतराव लाड, डॉ. प्रकाश कुंभार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. जयवंत आवटे यांनी स्वागत केले. सर्जेराव खरात यांनी मानपत्र वाचन केले. श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले. जी. के. जाधव यांनी आभार मानले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.