सोलापूर ः सोलापूरची विमानसेवा सुरू न झाल्याने सोलापूरच्या सर्वांगीण विकासास गती मिळत नाही. सोलापूरकरांच्या भावनांचा विचार करता ‘उड्डाण’ योजनेअंतर्गत सोलापूरहून विमानसेवा सुरू होणे अत्यावश्यक आहे. तरी या बाबत निर्णय घेण्यासाठी सोलापूर विमानतळ विकास समिती, जिल्हाधिकारी, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे अधिकारी यांची संयुक्तिक बैठक केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत आयोजित करण्याची मागणी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी स्वतः मंत्री शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.
सोलापूर विमानतळाची स्थापना १९५२ पासून झाली असून, २००९-१० मध्ये किंगफिशर एटीआर ७२ ने सोलापूर विमानतळ ते मुंबईपर्यंत सेवा दिली आणि नंतर बंद केली. शेती, वनपर्यटन आणि तीर्थक्षेत्र पर्यटनात अग्रेसर आहे. येथील चादरी, टॉवेल आणि कपडे देश-विदेशात प्रसिद्ध असून, त्यांची निर्यातही केली जाते. सोलापूरहून विमानसेवा न मिळाल्याने उद्योग व व्यापारावर विपरित परिणाम होत आहे. सुरुवातीला २१ नोव्हेंबर रोजी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. २२ सप्टेंबर रोजी केंद्रीय हवाई उड्डाणमंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेत निवेदन दिले. ३ मार्च २०२२ रोजी विमानतळ विकास प्राधिकरण समितीमध्ये आढावा घेतला.
वारंवार पाठपुरावा करूनही या मागणीस यश न आल्याने लोकांच्या भावना तीव्र होत आहेत. त्यामुळे सोलापूरहून विमानसेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे महाव्यवस्थापक आणि समितीचे सदस्यांची बैठक घेऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.