
Akola News : पश्चिम विदर्भातील अकोला जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या ७६ टक्के, तर बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यात सुमारे ६० टक्के पाऊस कमी झाला आहे. या तिनही जिल्ह्यात मोठा खंड पडल्याने खरीप हंगामाची स्थिती बिकट झाली आहे. या खंडामुळे पीक उत्पादनाला प्रचंड फटका बसण्याची शक्यता वाढली आहे.
यंदाच्या हंगामात जून महिन्यात कमी पाऊस झाल्याने जुलैत पेरण्या सुरू झाल्या. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाल्याने सर्वदूर पेरणी झाली. मात्र, कुठे पीक वाढीच्या, तर कुठे पिकावर फुलोरा स्थिती असताना पावसाचा खंड पडला. या खंडामुळे कपाशीची वाढ खुंटली.
फुलोऱ्यात आलेल्या मूग, उडीद, सोयाबीनच्या झाडांवर फुले गळून पडली. सुमारे ५० ते ६० टक्के फूलगळ झाली आहे. यामुळे साहजिकच उत्पादनात घट येणार निश्चित झाले आहे. ऑगस्टमध्ये अकोला जिल्ह्यात २१२ मिलिमीटर पाऊस अपेक्षित असताना केवळ ४९ मिमी झाला. बुलडाणा जिल्ह्यात १९५ च्या तुलनेत ७७ तर वाशीम जिल्ह्यात २१६ च्या तुलनेत ८६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.
पिके सुकू लागली
जिल्ह्यात पावसाचा खंड अनेक ठिकाणी २५ दिवसांच्या पुढे गेला. यामुळे हलक्या जमिनीवरील पिके जागेवरच सुकू लागली आहेत. सोयाबीनच्या झाडांवर फुले लागली होती. या काळात आर्द्रता न मिळाल्याने फूलगळ झाली. मूग, उडदाची लागवडच यंदा कमी आहे. जे पीक लागवड झाले त्याला कमी पावसामुळे शेंग धारणा होऊ शकलेली नाही. कोरडवाहू पट्ट्यातील कपाशी वाढ खुंटलेली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.