
Buldana News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत या खरीप हंगामात ज्या महसूल मंडलांत कमी पावसामुळे ५० टक्के उत्पादन घटीची शक्यता निर्माण झाली आहे, अशा मंडलांतील शेतकऱ्यांना २५ टक्के मर्यादेत आगाऊ रक्कम देण्याची तरतूद आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील आठ महसूल मंडलांत पावसात २१ दिवसांचा खंड पडल्याने सर्व्हेक्षणाचे काम हातात घेण्यात आले आहे.
पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात मागील सात वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. यामुळे जिल्ह्यातील जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव या तीन तालुक्यातील आठ मंडले निकषात बसत आहेत.
या मंडलांत कुठे २४ जुलै ते २८ ऑगस्ट तर, कुठे २९ जुलै ते १८ ऑगस्ट या काळात पावसात खंड पडल्याची नोंद झालेली आहे. यात जळगाव जामोद तालुक्यातील जळगाव, जामोद, आसलगाव, संग्रामपूर तालुक्यातील संग्रामपूर, बावनबीर, पातुर्डा, शेगाव तालुक्यात जवळा, मनसगाव मंडलांचा समावेश आहे.
या सर्व मंडलांमध्ये पावसात खंड पडल्याने अपेक्षित उत्पादनात घट अपेक्षित गृहीत धरली जात आहे. या मंडलांतील नुकसानभरपाई निश्चितीसाठी सर्व्हेक्षण करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्यासाठी समितीचे गठण करण्यात आले.
या समितीत तालुका कृषी अधिकारी हे अध्यक्ष असून कृषी विद्यापीठ किंवा कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, मंडल कृषी अधिकारी, पीक विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी सहायक (दोन) व संबंधित शेतकरी असे प्रतिनिधी आहेत.
समिती नेमून ज्वारी, मका, सोयाबीन, कपाशी, तूर आदी पिकांची अंतिम पेरणी अहवाल ग्राह्य धरून लागवडीखालील पिकाचे ५ टक्के क्षेत्रात १० वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्हेक्षणाचे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.