
Nagar News : जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातील रतनवाडी, घाटघर परिसरांत पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. त्यामुळे धरणात पाणी जमा होत असल्याने भंडारदरा, निळंवडे धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. २७) दुपारी बारा वाजता भंडारदरा धरणातून ७ हजार ६७८ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. निळवंडे धरणात ८४ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र पाण्याची आवक वाढत असल्याने निळवंडे धरणातूनही ७ हजार ८०० क्युसेकने विसर्ग सुरू केला होता. जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र पाऊस नाही.
अकोले तालुक्यातील पश्चिम भागात मात्र शनिवारपासून पावसाचा जोर वाढू लागला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या नोंदीनुसार घाटघरला ११४ मिलिमीटर, रतनवाडीला ११० मिलिमीटर, पांजरे येथे ८९ मिलिमीटर, भंडारदरा येथे ७३ मिलिमीटर, वाकी येथे ५३ मिलिमीटर, निळवंडे येथे १८ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे.
भंडारदरा धरणात शंभर टक्के पाणीसाठा झालेला असून, पाणी साठवणीला जागा नसल्याने जेवढे पाणी धरणात येईल त्याचा विसर्ग केला जात आहे. हे पाणी निळवंडे धरणात येत असून, निळवंडेचाही पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. एका दिवसात ४ टक्के पाणी आले. रविवारी (ता. २७) निळवंडेचा पाणीसाठा ८४ टक्के झाला आहे.
अशीच आवक राहिली तर दोन ते तीन दिवसांत धरण शंभर टक्के भरेल. त्यामुळे निळवंडेतही पाणीसाठा स्थिर ठेवून विसर्ग केला जात आहे. हे पाणी ओझर बंधाऱ्यातून जायकवाडीला जाणार आहे.
ओझर बंधाऱ्यातून विसर्ग केला जाणार आहे. मुळा नदीतून धरणात ३ हजार क्युसेकने पाणी येत आहे. मुळा धरणात आज सकाळपर्यंत ८१.३३ टक्के म्हणजे २१ टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.