
पुणे : पावसाळ्याचे जवळपास दोन महिने पूर्ण होत आले असून, या कालावधीत कमी-अधिक प्रमाणात पाऊस (Rain Update Pune) पडला आहे. विशेषतः धरण क्षेत्रात पावसाने जोरदार (Heavy Rainfall In dam Catchment Area) हजेरी लावली. पुणे जिल्ह्यातील २६ धरणांत १४७.७८ टीएमसी म्हणजेच ७४ टक्के एवढा पाणीसाठा (Water Storage) झाला आहे. त्यामुळे शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.
यंदा जून महिन्यात कमी पाऊस झाला होता. त्यामुळे चालू वर्षी पुरेसा पडतो की नाही, अशी स्थिती झाली होती. परंतु ३० जूनच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यानंतर एक जुलैपासून जोरदार पाऊस पडण्यास सुरुवात झाली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होता. परंतु दुसऱ्या आठवड्यात पावसाने चांगलाच जोर धरला. त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील भात खाचरे भरून वाहू लागल्याने धरणांत नव्याने पाण्याची आवक सुरू झाली. त्यातच गेल्या महिनाभरापासून मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा या घाटमाथ्यावर जोरदार पावसास सुरुवात झाली. सुरुवातीला हा पाऊस कमी स्वरूपाचा होता. परंतु हळूहळू मॉन्सून सक्रिय होत गेल्याने या घाटमाथ्यावर अतिवृष्टीसदृश पाऊस पडला.
मुळशीच्या घाटमाथ्यावर सर्वाधिक पाऊस पडला असून, आतापर्यंत सुमारे ३ हजार ७८२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे. त्या पाठोपाठ लोणवळा २,८२३, वळवण २२१५, ठोकरवाडी १६४३, तर शिरोटा या घाटमाथ्यावर १३२१ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.
जिल्ह्यातील एकूण धरणांचा उपयुक्त पाणीसाठा क्षमता ही १९८.३२ टीएमसी एवढी असून, त्यापैकी आतापर्यंत धरणांत १४७.७८ टीएमसी एवढा पाणीसाठा झाला आहे. म्हणजे ७४ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत धरणांतील पाणीसाठा ११६.६८ टीएमसी म्हणजेच ५८ टक्के एवढा झाला होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगलीच वाढ झाली आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांत मंगळवारी (ता.२६) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये ३.९२ टीएमसी एवढा नव्याने पाणीसाठा दाखल झाला आहे. तर एक जूनपासून मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणांत २४.८२ टीएमसी एवढा पाणीसाठा नव्याने दाखल झाला आहे.
नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडिवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर, वीर या धरणांत ३७.६२ टीएमसी, तर कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड या धरणांत ३२.४१ टीएमसी, याशिवाय उजनी ४४.९० टीएमसी, मुळशी १७.७२ टीएमसी एवढा नव्याने पाणीसाठा दाखल झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील तीन धरणे भरली असून, उर्वरित काही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत.
काही धरणे भरली असल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्याने मुठा, भीमा, आरळा, इंद्रायणी, कुकडी, मीना, घोड या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. परंतु गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने या नद्यांतील पाण्याचा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आला आहे.
धरणनिहाय झालेला पाणीसाठा, टीएमसीमध्ये :
धरण --- धरणांची क्षमता -- उपयुक्त पाणीसाठा (टक्केवारीत)
टेमघर---३.७१---२.२२---५९
वरसगाव---१२.८२---९.०३---७०
पानशेत---१०.६५---८.१३---७६
खडकवासला---१.९७---१.७८---९०
पवना---८.५१---६.७६---७९
कासारसाई -- ०.५७ --- ०.५० --- ८७
कळमोडी --- १.५१ --- १.५१ -- १००
मुळशी---१८.४६---१४.४६---७१
चासकमान---७.५८---७.४४--- ९८
भामा आसखेड---७.६६---७.०५--९१
आंध्रा -- २.९२ -- २.९२ -- १००
वडिवळे -- १.०७ -- ०.९१ -- ८४
शेटफळ -- ०.६० -- ०.३५ -- ५९
नाझरे -- ०.५९ --- ०.०२ -- ४
गुंजवणी -- ३.६९ --- ३.१२ --- ८४
भाटघर---२३.५०--- १६.४१--- ६९
नीरा देवघर---११.७२---७.५८---६४--
वीर --- ९.४१ --- ९.२१ -- ९७
पिंपळगाव जोगे -- ३.८९ -- २.६४ -- ६७
माणिकडोह---१०.१७---५.७०---५६
येडगाव -- १.९४ -- १.८० -- ९२
वडज -- १.१७ -- ०.९५ -- ८१
डिंभे---१२.४९---९.६६---७७
चिल्हेवाडी -- ०.८० -- ०.६१ -- ७६
घोड---५.४७---३.७२---७६
विसापूर -- ०.९० -- ०.४५ -- ४९
उजनी---११७.२१ --- ३६.९०--- ६८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.