
Sangli News : जिल्ह्याच्या दुष्काळी पट्ट्यातील पळशी (ता. खानापूर) गावाने वीस वर्षांपासून द्राक्ष निर्यातीत ओळख निर्माण केली आहे. निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनाचं बाळकडू घेत येथील तरुण शेतकरी तयार झाले. पदवीधर शेतकरी बाहेर जाऊन नोकरी करण्यापेक्षा गावातच द्राक्षं शेतीतच ‘करिअर’ घडविताना दिसतात.
पळशी हे साडेतीन हजार लोकसंख्येचं गाव. वीस वर्षांपूर्वी पिण्यासाठी केवळ कूपनलिकांचा आधार. टॅंकरे पाणी आणून शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा जगविल्या. गावानं दुष्काळाची झळ सोसली असल्याने शेतीतून परिस्थिती सुधारणे शक्य नव्हते. आपल्या मुलांनी स्पर्धा परीक्षा देऊन उच्च पदावर, खासगी कंपनी अशा ठिकाणी नोकरी करावी अशी प्रबळ घरच्यांची इच्छा. त्यामुळे अमित गुरव, तुषार पाटील आणि प्रवीण पाटील हे तिघे नोकरी करू लागले.
मनाची घालमेल
नोकरीत मन रमले नाही. सतत शेतीचा विचार येत. घराच्यांशी शेती बाबत बोलणे व्हायचे. द्राक्ष बाग लावू. नोकरीपेक्षा शेतीतून अधिक पैसा मिळेल. समाधानही मिळेल. पण दुष्काळ पाठ सोडत नसल्याने शेती व्यवस्थित साधता येणार नाही, असं घरच्यांच मत. मनाची घालमेल सुरू होती.
...अन् ‘कृष्णा’ अवतरली !
गावापासून १० किलोमीटर अंतरावर असलेले नेलकरंजी येथून टेंभू योजनेचा मुख्य कालवा गेला आहे. पाणी विकत घेऊन द्राक्ष शेती करणे आव्हानात्मक होते. त्यामुळे २०१२-१३ मध्ये गावातील तरुण एकत्र आले. त्यांनी पाइपलाइन करून शेतीला पाणी आणले. टेंभूचे आवर्तन सुरू झाली शेततळे भरून ठेवत. पाणी कमी पडल्यास शेततळ्यातील पाणी वापरले जात. चार वर्षांपूर्वी टेंभू योजनेमुळे शिवारातच ‘कृष्णा’ अवतरली. शाश्वत पाण्याची सोय झाली अन् या तरुणांचा उत्साह वाढला.
मित्रांच्या शेतीतून प्रेरणा
गावातील सुशीलकुमार पाटील, दादासाहेब जाधव, देवदास जाधव, पंकज पिसे आणि विजय बाबर हे देखील पदवीधर. अमित, तुषार आणि प्रवीण यांचे मित्र. नोकरीच्या मागे न लागता ते द्राक्ष शेतीत रमलेले. निर्यातक्षम दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेण्यात हे माहीर. त्यांची प्रगती पाहिली. त्यामुळे पुन्हा एकदा घराताली सदस्यांची विचारविनिमय केला अन् अखेर द्राक्ष शेती करण्यास परवानगी दिली.
गुणवत्तेवर काटेकोर लक्ष
तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मित्रांसह द्राक्ष शेती सुरू केली. निर्यातक्षम द्राक्षासाठी मणी सेटिंगपासून फळ काढणीपर्यंतच्या कालावधीत बागेत येणाऱ्या किडी- रोगांवर नियंत्रण ठेवण्याकरिता एनआरसीच्या शिफारशीनुसार काटेकोर व्यवस्थापन ठेवलं जातं. जमिनीचा पोत आणि द्राक्षाचा दर्जा टिकविण्यासाठी सेंद्रिय खतांचा अधिक वापर केला जातो, असे अमित आणि सुशीलकुमार यांनी सांगितले.
निर्यातीला गवसणी
पळशीमधील द्राक्षे विशेष करून युरोप खंडात जातात. नेदरलॅंड, इंग्लंड, रशियासह दुबईमध्ये येथील द्राक्षांना विशेष पसंती आहे. द्राक्ष तयार झाल्यानंतर व्यापारी १२० ते १३० व्या दिवशी सॅंपल काढून नेतात. तपासणी झाल्यानंतर व्यापारी हव्या त्या प्रमाणात द्राक्षांची काढणी करतात. गावात निर्यातीसाठी द्राक्षांची खरेदी करणारे मोजकेच व्यापारी असल्याचे प्रवीण पाटील, दादासाहेब जाधव यांनी सांगितले. येथील जिद्दी शेतकऱ्यांनी दुष्काळात बागा केवळ जगविल्याच नाहीत, तर त्या निर्यातक्षमही बनविल्या.. अन् द्राक्ष शेतीत नावलौकिक मिळविला!
पळशी गाव दृष्टिक्षेपात
भौगोलिक क्षेत्र : १६६२ हेक्टर
लागवडी खालील क्षेत्र : ९४१ हेक्टर
द्राक्षे : २४० हेक्टर
निर्यातीचे वाण : तास ए गणेश, थॉमसन, क्लोन टू, माणिक चमन
एकरी उत्पादन : १० ते १२ टन
वातावरणाचा लाभ
पळशीचे वातावरण कोरडं आहे. आद्रर्ता, दव कमी आहे. द्राक्षरसाठी पोषक हवामान. १३५ ते १५० दिवसांत निर्यातक्षम द्राक्षे तयार होतात. रंग एकसारखा मिळण्यास मदत होते. अति उष्णतेसाठी घडांना पेपरचे रॅपिंग केल्याने रंग बदलत नाही. द्राक्षांची गोडी १८ ब्रीक्स इतकी, तर मण्यांचा आकार १८ एमएम इतका मिळतो.
प्रवीण भीमराव पाटील, ९०११३१३२०३,
अमित गुरव, ८६००७००५५५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.