Agriculture Success Story : ‘संघर्ष आहे! पण शेतीतच आयुष्य आहे...’

A Legacy of Agriculture : बिकट परिस्थितीतून संघर्ष पचवत धानोरा (जि. जळगाव) येथील नारायणराव पाटील यांनी शेतीत उल्लेखनीय प्रगती करीत ४५ एकरांचे मालक होण्यापर्यंत यश मिळवले. त्यांचा मुलगा दीपक यांनीही शेतीतच करिअर केले.
Narayan Patil
Narayan PatilAgrowon

चंद्रकांत जाधव

Success Story of Farmer : जळगाव जिल्ह्यातील धानोरा (ता. चोपडा) गाव केळी उत्पादनात आघाडीवर आहे. कापूस, रब्बीत हरभरा, मका व अन्य पिकेही असतात. काळी कसदार, मध्यम जमीन शिवारात आहे. मोठा जलस्रोत गावात नाही. पाटपाण्याची व्यवस्था गावाच्या दक्षिणेला आहे. पण तिचा फारसा उपयोग गावास होत नाही. पाऊसमान कमी राहिल्यास केळी पीक संकटात सापडते.

याच गावात नारायण पाटील यांची ४५ एकर शेती आहे. आठ कूपनलिका, दोन बैलजोड्या, सालगडी, म्हशी अशी यंत्रणा आहे. केळी हे अगदी १९७५ पासून त्यांचे मुख्य पीक राहिले आहे. कापूस, हरभरा, मका पिकांतही दांडगा अनुभव तयार झाला आहे.

सुरुवातीचा खडतर प्रवास

नारायणरावांचे आजचे वय सुमारे ७६ वर्षे आहे. किशोरवयीन असतानाच त्यांच्या वडिलांचे १९६५ मध्ये निधन झाले. चार बहिणी, आई असा परिवार सोबत होता. त्या वर्षी दुष्काळी स्थिती होती. वडिलांचे निधनानंतरचे सोपस्कार व अन्य विधींसाठी पुरेसा पैसा हाती नव्हता. अशावेळी नातेवाइकांनी आर्थिक मदत केली.

दहा एकर वडिलोपार्जित शेतीची जबाबदारी लहान वयातच नारायणरावांवर आली. कितीही संकटे आली तरी शेतीतच कारकीर्द घडवायची, हार पत्करायची नाही असा बाणा त्यांनी ठेवला. सन १९६७-६८ चा तो काळ होता. विहिरीला ४० फुटांपर्यंत पाणी होते. पण पाणी उपसण्यासाठी मोटेचा आधार घ्यावा लागे.

अर्धा ते पाऊण एकरात गहू, अन्य पिके घ्यायची, अन्य शेतकऱ्यांकडे मजुरीला जायचे असा प्रतिकूल परिस्थितीतील चरितार्थ सुरू होता. चारही बहिणींची साथ होती. त्यामुळे अडचणींतून मार्ग निघायचा. त्याच वेळी जातिवंत पशुधनाचे संगोपन करण्याचा छंद लागला. आजही तो टिकून आहे.

Narayan Patil
Improved Agriculture Success Story : बीज अंकुरे अंकुरे...

वीज आली, केळी घेतली

सन १९७५ च्या दरम्यान शिवारात वीज आली. त्या वेळेस विहिरीवर पंप, जलवाहिनीची सोय करण्यासाठी तीनशे रुपयांची गरज होती. पण पैसा नसल्याने नातेवाइकांकडे उसनवारी केली. त्यानुसार काम पारही पडले. त्या वर्षी दोन एकरांत गव्हाचे पीक घेतले. पण केवळ हंगामी पिकांवर अवलंबून राहणे शक्य नव्हते.

त्यामुळे नारायणराव केळीसारख्या नगदी, व्यावसायिक पिकाकडे वळले. सुमारे अडीच हजार झाडांच्या लागवडीचे धाडस केले. मोठ्या कष्टाने बाग यशस्वी केली. कष्टाचे फळ मिळू लागले. चांगली अर्थप्राप्ती होऊ लागली. जमीन सुपीक होती. पीक जोमदार असायचे. व्यवस्थापनही चांगले केले. प्रगती होत गेली.

संघर्षाचे पुन्हा प्रसंग, त्यातून वाटचाल

सन १९७८ मध्ये आणखी एका विहिरीची गरज भासली. स्वतः खोदकामात सक्रिय होऊन नारायणरावांनी या विहिरीवर पंप, वीज सुविधा, जलवाहिनी व मजुरीपोटी त्या काळात सात हजार रुपये खर्च केला. आजच्या काळात त्याचे मूल्य एक लाखाच्या पुढे असेल, असे दीपक (नारायणरावाचा मुलगा) सांगतात.

शेतीचा पसारा वाढवताना सालगडी नियुक्त केला. परंतु त्या वर्षी दुष्काळ पडला. सालगड्याला वर्षाला द्यावयाची ३०० रुपये रक्कम उभी करणेही कठीण झाले. पण हार न मानता शेतीचा विकास सुरूच ठेवला. हाती जसा पैसा येईल तो शेती घेण्यात गुंतवायचा हे उद्दिष्ट ठेवले. मुलगा दीपकदेखील आता शेती व्यवस्थापनात तरबेज झाले होते. शेतीतूनच मुलगा व चार मुलींचे विवाह करणे नारायणरावांनी शक्य केले.

Narayan Patil
Agriculture Industry : उच्चशिक्षित युवकाने मानले शेतीलाच उद्योग

नियोजनबद्ध शेती

सन १९७५ पासून केळी शेतीतील तगडा अनुभव तयार झाला आहे. सध्या या पिकाखाली १५ एकर क्षेत्र आहे. मृग व कांदे असे दोन बहर घेण्यात येतात. सुरुवातीला देशी, आंबेमोहोर, महालक्ष्मी, सातमासी, बुटकी, उंच श्रीमंती आदी वाणही घेतले. सध्या ग्रॅण्ड नैन मुख्य वाण आहे. २० ते २५ किलोची रास मिळते.

व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात. अलीकडील काळात किलोला १५ पासून ते २४ रुपयांपर्यंत दर मिळत असल्याने केळी पीक फायदेशीर ठरत आहे. जोडीला कपाशी व मका पिकेही अर्थकारणात भर टाकत आहेत.

तिसरी पिढीही शेतीत

शेतीशी बोला, पिकांशी संवाद साधा, मातीचे आरोग्य जपा हे पाटील कुटुंबाचे शेतीतील तत्त्वज्ञान आहे. वयाच्या ७६ व्या वर्षीही नारायणरावांचा शेतीतील उत्साह कायम आहे. सकाळी सात, दुपारी १२ आणि पुन्हा सायंकाळी अशा तीन वेळेस ते शेतात जाऊन व्यवस्थापनातील बाबी पाहतात. दीपक यांचे वय आज ४९ वर्षे असून, त्यांना शेतीतील वीस वर्षांचा अनुभव तयार झाला आहे.

आपला मुलगा मितेशने देखील शेतीतच लक्ष घालावे, त्यात प्रगती करावी व कुटुंबाची तिसरी पिढीही शेतीत यावी अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार मितेशने कृषी पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, पदव्युत्तर पदवीसाठी त्यास राहुरी येथील कृषी विद्यापीठात पाठवण्याचे वडिलांचे नियोजन आहे.

दीपक पाटील ९८२२८८६७६७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com