
Agriculture Padma Award : यवतमाळ येथील नैसर्गिक शेतीतील प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी सुभाष शर्मा यांची ओळख केवळ राज्यापुरती मर्यादित नाही. तर संपूर्ण देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या बहुविध पीक पध्दतीचा व नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार झाला आहे. वर्षभरातील विविध काळात बाजारपेठेतील मागणी लक्षात घेऊन त्यानुसार शर्मा विविध पिकांचे नियोजन करतात. म्हणजे शेतीत व्यावसायिक दृष्टिकोन जपण्यासह मातीची सुपीकता जपणे, सेंद्रिय कर्ब वाढवणे या गोष्टींनाही त्यांनी तेवढेच महत्त्व दिले आहे.
शर्मा यांचे वडील खेतूलाल यांची १६ एकर शेती होती. वडिलांच्या निधनानंतर शेतीची संपूर्ण जबाबदारी शर्मा यांच्यावर आली. वडिलांकडूनच त्यांनी शेतीचे धडे गिरविले होते. दरम्यानच्या काळात काही वाद-विवादांमुळे २०११ मध्ये आपल्या डोरली गावातील वडिलोपार्जित शेती विकण्याचा निर्णय शर्मा यांना घ्यावा लागला. त्या पैशांमधूनच यवतमाळ जिल्ह्यातील तिवसा शिवारात १६ एकर जमीन खरेदी केली.
डोक्यावर कर्जाचा भारही मोठा होता. यवतमाळ हा कर्जापायी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. अशा कर्जदार शेतकऱ्यांमध्ये मी देखील होतो. परंतु संघर्षाचा वारसा वडिलांकडूनच मिळालेला असल्याने आत्महत्या करणार नाही या विचारांवर ठाम होतो असे शर्मा सांगतात.
सकारात्मक विचारांतून किफायतशीर शेती पध्दतीचा शोध सुरु केला. रासायनिक शेती पद्धतीत खर्च जास्त होतो. पर्यावरणाचीही हानी होते . त्या तुलनेत उत्पादन समाधानकारक नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर जागतिक नैसर्गिक शेतीचे प्रणेते मासानोबू फुकुओका, भास्कर सावे यांच्या शेती पध्दतीचा अभ्यास सुरू केला. त्यानुसार शेतीचा विकास करण्यास सुरवात केली.
काळ्या आईला केले सशक्त
पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब मातीत मुरला पाहिजे, तो वाया जाता कामा नये या दृष्टीने मूलस्थानी जलसंधारणाचे प्रयोग शर्मा यांनी केले आहेत. कंटूर पद्धतीने लागवड तंत्रज्ञानाचा ते वापर करतात. बाजरा, चवळी, बोरु किंवा धैंचा आदी हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते. काही पिके आपल्यासाठी तर काही जमिनीसाठी असे शर्मा यांचे तत्त्व आहे.
काळ्या आईला सशक्त करणे, तिचे आरोग्य जपणे या गोष्टीला शर्मा यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. त्यातूनच त्यांच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब दोनच्या वर पोचला आहे. आज १६ एकरांपैकी दहा टक्के क्षेत्रात कडुनिंब, पिंपळ तसेच अन्य वृक्ष आहेत.
बाजरा, चवळी, बोरु किंवा धैंचा आदी हिरवळीच्या पिकांची लागवड केली जाते. काही पिके आपल्यासाठी तर काही जमिनीसाठी असे शर्मा यांचे तत्व आहे. जोडीला गोसंगोपन व संवर्धनालाही तेवढेच महत्त्व देत देशी दूध, शेण-गोमूत्र यांना चालना दिली आहे.
बहुविध पीक पद्धती
तूर, हरभरा, कोथिंबीर तसेच त्याचे बीजोत्पादन (धणे), कांदा, देशी टोमॅटो, उंच वाढणारा वाल हळद, वांगे, भोपळावर्गीय पिके, मेथी आदी विविध पिकांची लागवड शर्मा यांच्या शेतात दिसून येते. तूर, हरभरा, हळद यांवर प्रक्रिया करून पावडर निर्मिती करून विक्री होते. त्यातून अधिक उत्पन्न मिळते. कडुनिंब तसेच अन्य वृक्ष आहेत. सीताफळ, आंबा व अन्य फळझाडे आहेत. झाडांच्या माध्यमातून पक्षांसाठी निवारा तयार केला आहे. या पक्षांकरवी किडींचे नैसर्गिक नियंत्रण होते.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
जे जे आपणांसी ठावे ते ते इतरांशी सांगावे या संत विचारांचा वारसा शर्मा यांनी जपली आहे. आजवर देशभरातील साडेतीन लाख शेतकऱ्यांपर्यंत नैसर्गिक शेती पद्धती तंत्रज्ञानाचा प्रसार त्यांनी केला आहे. त्यांच्या शेतावरच एक दिवसांहून अधिक काळाचे प्रशिक्षण वर्ग भरतात.
ॲग्रोवनने दिले बळ
शर्मा यांच्या शेतीतील प्रयोगांविषयी ॲग्रोवनने वेळोवेळी प्रसिध्दी दिली. त्याचबरोबर त्यांच्या शाश्वत, नैसर्गिक, व्यावसायिक शेतीचे मॉडेल समजावून सांगणारी नऊ भागांची मालिकाही प्रसिद्ध केली. ॲग्रोवनतर्फे महाराष्ट्राचा स्मार्ट शेतकरी पुरस्कारानेही (२०१९) शर्मा यांना गौरवण्यात आले आहे.पद्मश्री पुरस्कारापर्यंतच्या या वाटचालीत ॲग्रोवनचे पाठबळ विसरता येणार नाही अशी प्रतिक्रिया शर्मा यांनी व्यक्त केली आहे.
सुभाष शर्मा ९४२२८६९६२०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.