
Jaggery Industry Kolhapur : गुळासाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर बाजार समितीत आता वर्षातील दहा महिने गुळाचे सौदे होतात. काही वर्षांपूर्वी ऊस हंगाम कालावधीतच फक्त स्थानिक ठिकाणी उपलब्ध उसावरच गूळ हंगाम अवलंबून असायचा. जिल्ह्यात विशेषतः करवीर, कागल, राधानगरी तालुक्यांमध्ये खास गुळासाठी ऊस उत्पादनाची पद्धत होती. उसाचे वाणही तसेच निवडले जायचे. हंगामाची समाप्ती मार्च- एप्रिललाच व्हायची. पूर्ण उन्हाळ्यामध्ये कुठेच गुऱ्हाळे सुरू नसायची. आता मात्र हा ‘ट्रेंड’ बदलला आहे.
कर्नाटकमधील ट्रेंड कोल्हापुरात
काही वर्षांपासून कोल्हापूर बाजार समितीत कर्नाटक राज्यातूनही गूळ येऊ लागला आहे. तेथे बारमाही गूळ घेण्याची प्रथा आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत कोल्हापूर बाजार समितीत गूळ नसल्याचे पाहून त्या राज्यातील शेतकऱ्यांनी इकडे गूळ पाठवण्यास प्रारंभ केला.
त्यामुळे गुऱ्हाळ मालकांनीही उन्हाळी व पावसाळी हंगामाच्या प्रारंभापर्यंत गूळ उत्पादन सुरू करण्याचा प्रयत्न केला. वास्तविक स्थानिक ठिकाणी ऊस उपलब्ध नव्हता. त्यामुळे गुळाचे क्षेत्र नसलेल्या भागातून, कर्नाटकातूनही गुऱ्हाळ व्यावसायिक ऊस आणू लागले.
पंचवीस गुऱ्हाळे सुरू
मुख्य हंगाम संपल्यानंतर सध्या कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पंचवीस गुऱ्हाळघरे सुरू आहेत. संततधार पाऊस लागून राहणार नाही तोपर्यंत गुळाचे उत्पादन सुरू राहील. अनेक व्यावसायिकांनी गुळाचे उत्पादन नियमित राहण्यासाठी बंदिस्त शेडमध्ये जळण सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था केली. कर्नाटकातून ऊस पोहोच होत असल्याने तोडणीच्या दृष्टिकोनातून मजुंरासाठी धावाधाव गुऱ्हाळ मालकांना करावी लागत नसल्याचे चित्र आहे.
व्यापाऱ्यांनी बदलली मानसिकता
गुजरातमध्ये गुळाला वर्षभर मागणी असते. पूर्वी हंगाम संपल्यानंतर गुळाची उपलब्ध होत नसल्याने गुजरातमधील व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी करून गूळ शीतगृहात ठेवायचे. गरजेनुसार तो बाहेर काढायचे. आता दोन वर्षांपासून कोल्हापूर बाजार समितीत बारमाही गूळ उपलब्ध होऊ लागला आहे. त्यामुळे गुजरातमधील व्यापाऱ्यांनी शीतगृहासांठी खरेदी करणे जवळपास बंद केले आहे.
त्यामुळे पावसाळी वातावरणातही गुळाची दररोज खरेदी होत आहे. यंदा मे महिन्यातच संततधार पावसाला सुरुवात झाल्याने बाजार समितीत मे महिन्यात होणाऱ्या आवकेत ३० ते ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. मागणी कमी असली तरी व्यापाऱ्यांकडून नियमित खरेदी सुरू आहे. सध्या बाजार समितीत एक दिवसाआड तीन ते चार हजार गूळ रव्यांची (ढेपा) आवक होत आहे. पावसामुळे गूळ उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. सध्या प्रति क्विंटल सरासरी ४००० ते ४३०० रुपये दर मिळत आहे.
गुणवत्तेसह पॅकिंगलाही महत्त्व
गुळाचे आगर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गुऱ्हाळघरांतून पूर्वी तीस किलोचे रवे (ढेप) बनायचे. आता ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन एक किलो, अर्धा किलो पॅकिंग अधिक लोकप्रिय होऊ लागले आहे. मॉलधारकांच्या मागणीप्रमाणे त्या वजनाचा गूळही सादर करण्यात येत आहे. गुणवत्तेसह पॅकिंगलाही महत्त्व आले आहे.
बाजार समितीतही एक किलो गुळाचे सौदे होऊ लागले आहेत. या वजनाची ढेप व्यापाऱ्यांच्या दृष्टीनेही फायदेशीर ठरते. मुंबईतूनही हा गूळ आखातामध्ये निर्यात होतो. एक किंवा दहा किलो असे एकच पॅकिंग करण्याऐवजी वेगवेगळ्या वजनाचे पॅकिंग केल्यास त्याला मागणी चांगली राहू शकते. हा ट्रेंड चांगलाच लोकप्रिय झाला आहे. या गुळास क्विंटलला तीनशे ते पाचशे रुपये जादा दर मिळतो.
नियमित गूळ हंगामाच्या तुलनेत पावसाळ्यात तयार होणाऱ्या गुळासही तितकाच दर मिळतो. त्यामुळे हंगाम संपल्यानंतरही हाती पुरेशी रक्कम राहत नाही. त्यामुळे आम्ही किमान जून- जुलैपर्यंत गुऱ्हाळे सुरू राहतील या बेताने गुळाचे उत्पादन सुरू केले. अखंड जोरदार पाऊस सुरू राहील त्याचवेळी गूळनिर्मिती बंद होईल. श्रावणामध्ये पाऊस कमी असल्यास त्यावेळीही निर्मितीला आम्ही प्राधान्य देतो. अर्थात त्या काळात थोडे अधिक दर मिळतात.
अमित पाटील ९६७३१०५१११
गूळ उत्पादक, खुपिरे, ता. राधानगरी, जि,. कोल्हापूर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.