
Agriculture Success Story : कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे खुर्द ( ता. कागल) हे ऊस पट्ट्यातील गाव आहे. येथील जोतिराम मालवेकर व त्यांची पत्नी अश्विनी जरग यांची चार एकर शेती आहे. स हेच मुख्य पीक आहे. शेतीतूनच आपला संसार चांगल्या प्रकारे फुलावा यासाठी हे दांपत्य कष्टांमध्ये कोणतीही कसर ठेवत नव्हते. अश्विनी यांनी दहा वर्षे गुलाबाची यशस्वी शेती केली.
त्यातून दररोज चांगला ताजा पैसा हाती यायचा. परंतु कोरोना काळात गुलाबाचे दर कमालीचे घसरले. अश्विनी यांच्याच शब्दात सांगायचं तर ग्राहकांनी प्लॅस्टिक फुलांना प्राधान्य द्यायला सुरवात केली. ही शेती परवडेनाशी झाली. अखेर ती थांबवावी लागली. मग दुग्धव्यवसाय सुरू केला. मात्र त्यातही जनावरांवरील खर्च, मिळणारा परतावा यांचे गणित जुळेना. अखेर अनेक प्रयत्नांनंतर हा व्यवसायही बंद केला.
रेशीम शेतीने दाखवली वाट
गुलाबशेती व दुग्धव्यवसायातून अर्थकारण जुळले नसल्याने आता उत्पन्नाचा सक्षम पर्याय मिळवण्याच्या प्रयत्नात अश्विनी होत्या. चार वर्षापूर्वी प्रदर्शनात रेशीम शेतीविषयक माहिती घेतली. त्याचा चांगला अभ्यास केला. जिल्ह्यातील यळगूड परिसरातील काही रेशीम उत्पादकांच्या प्लॉटला भेटी दिल्या. त्यातून शेती व्यवस्थापन व बाजारपेठेचे बारकावे समजून घेतले. जिल्हा रेशीम अधिकारी राजेश कांबळे, प्रियांका चंदनशिवे यांचेही मार्गदर्शन घेतले.
मनरेगा योजनेतून रेशीम शेतीला सुरवात झाली. त्याचे आत्तापर्यंत ३० ते ४० हजार रुपये अनुदानच हाती आले आहे. मात्र एकूण चार चे पाच लाख रुपये खर्च करून शेतातच ५० बाय २० फूट आकारमानाचे शेड उभारले. त्यात चार रॅक्स आहेत. प्रत्येक रॅकचे आकारमान १५ बाय पाच फूट आहे. प्रत्येक रॅकला पाच असे एकूण वीस कप्पे आहेत. गडहिंग्लज येथील रेशीम विभागाकडून अंडीपुंज उपलब्ध होतात. प्रति शंभर अंडीपुंजांचा ७०० रुपये दर आहे.
व्यवस्थापनातील काही बाबी
दांपत्याचा दिवस पहाटे पाचला सुरू होतो. घरचा स्वयंपाक, घरची आवराआवर, दैनंदिन कामे या बाबी सांभाळून अश्विनी रेशीम शेतीचे संपूर्ण व्यवस्थापन पाहतात. सातत्यपूर्ण कष्ट व कौशल्यातून आता किमान दोन वर्षांचा अनुभव पूर्ण झाला आहे. व्यवसायाला गती येऊ लागली आहे. अळ्यांना दर्जेदार, हिरवा पाला कायम उपलब्ध होत राहावा यासाठी दोन एकरांत टप्प्याटप्प्याने व्ही वन तुती वाणाची लागवड केली आहे.
प्रति बॅच १५० ते २०० अंडीपुंजांची घेतली जाते. दांपत्याने अत्यंत कष्टपूर्वक नियोजन करून वर्षाला ११ ते बारा बॅच घेऊन कोष उत्पादनात सातत्य राखले आहे. अर्थात प्रत्येक महिन्याला बॅच घेण्याच्या दृष्टीने वेळेची मर्यादा राखून नियोजन काटेकोर करणे गरजेचे असते. त्यासाठी अळीच्या पहिल्या दोन अवस्थांचे संगोपन घरातील खोलीत केले जाते.
उर्वरित दोन अवस्था (मोल्ट) शेडवर वाढवल्या जातात. कोषांची काढणी झाल्यानंतर त्याच दिवशी शेडची स्वच्छता होते. प्रत्येक बॅच संपल्यानंतर शेडचे तातडीने निर्जंतुकीकरण केले जाते. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी चुना आणि विजेता पावडरची धुरळणी केली जाते. रॅक धुऊन शेडचे वातावरण स्वच्छ ठेवले जाते.
तापमान नियंत्रण
हवामान बदलामुळे तापमानात सातत्याने चढउतार जाणवत आहेत. त्यामुळे शेडमध्ये नियंत्रित वातावरण राखणे आव्हानाचे ठरत आहे. शेडमध्ये २७ ते २८ अंश सेल्सिअस तापमान राहील याची दक्षता घेतली जाते. उन्हाळ्यात शेडच्या छपरावर स्प्रिंकलरद्वारे थंडावा तयार केला जातो. उष्णतेची तीव्रता वाढल्यास फॉगरर्सचा वापर केला जातो. आर्द्रता ५५ ते ६० टक्के राहील याची दक्षता घेतली जाते. माशांपासून अळ्यांना संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना प्रतिबंध करणारे पडदेही लावले आहेत.
उत्पादन, विक्री
चंद्रिका तयार होईपर्यंत शेवटच्या सप्ताहात दांपत्याची खूप धावपळ असते. या काळात अळ्यांना पाल्याची अधिक गरज भासत असल्याने तुतीची कापणी व पुरवठा हे नियोजन महत्त्वाचे राहते. प्रति १०० अंडीपुंजांपासून ७० ते ८० किलोपर्यंत तर प्रति बॅच १४० किलोपर्यंत कोष उत्पादन मिळते.जिल्हा परिसरात आरळे, हेब्बाळ, गोकाक, तासगाव आदी ठिकाणी धागेनिर्मिती करणाऱ्या मिल्स आहेत. तेथे कोषांचा पुरवठा होतो. श्विनी किंवा जोतिराम स्वतः वाहन करून मिल्सपर्यंत कोष घेऊन जातात. प्रति किलो ४५० ते ५५० रुपये दर मिळतो.
अर्थकारण केले सक्षम
अश्विनी सांगतात की आम्ही पती-पत्नी दोघेच रेशीम शेतीत राबतो. दहावी इयत्तेत असलेला मुलगा ओम देखील मदत करतो. रेशीम शेतीतून आम्हाला उत्पन्नाच्या ६० टक्के नफा होऊ लागला आहे. अठरा १८ महिन्यांनंतर उसापासून जे उत्पन्न हाती येते तेवढी रक्कम रेशीम शेतीच्या काही बॅचमध्येच मिळू लागली आहे.
अर्थकारण सक्षम होत असून शेतीचा विकास करण्यासही सुरवात केली आहे. रेशीम शेती करू इच्छिणारे शेतकरी आत येथे भेटी देतात. कृषी विभागाचेही सहकार्य मिळत आहे. पुढील काळात कोषांपासून धागा बनवणे व धाग्यापासून पैठणी बनविण्याचे ध्येय अश्विनी यांनी ठेवले आहे.
पतीची लाभलेली समर्थ साथ
पती जोतिराम बीएस्सी ॲग्रीपर्यंत शिकले असल्याने त्यांच्या ज्ञानाची साथही शेतीत मिळते. अश्विनी यांच्या आई-वडिलांचे निधन झाल्यानंतर जोतिराम यांनी अश्विनी यांना माहेरचेच नाव कायम ठेवण्याबाबत होकार भरला. शिवाय माहेरच्याच नावे चार एकर शेती देखील पतीने पत्नीच्या नावे करून दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.