Cashew Processing Industry : मंगळवेढ्या जवळील अभय नागणे यांचा आधुनिक तंत्र युक्त यशस्वी काजू प्रक्रिया उद्योग

Cashew Orchard : स्वतःची काजू बाग नाही. मात्र बाहेरून काजू बिया आणून प्रक्रिया करून गुणवत्तापूर्ण काजू तयार करण्याचा प्रकल्प ओझेवाडी (जि. सोलापूर) येथील अभय नागणे या युवकाने उभारला आहे.
Cashew Processing Industry
Cashew Processing IndustryAgrowon
Published on
Updated on

Success Story : सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढ्यापासून १० ते १२ किलोमीटरवर ओझेवाडी गाव आहे. गावाच्या पुढे पंढरपूर रस्त्यावर अभय नागणे यांची तीन एकर शेती आहे. माण नदीचा काठ लाभल्याने ओझेवाडीसह परिसरात ऊस, डाळिंब शेती सर्वाधिक होते.

अभय यांचे वडील मुख्याध्यापक तर आई गृहिणी आहे. अभय यांचे मोठे बंधू अक्षय बी.टेक. झाले असून, लहान बंधू मंगेश हेच शिक्षण घेत आहेत.

अभय यांचेही ‘एमबीए’चे शिक्षण सुरू आहे. शेती कमी व त्यात वडील नोकरीत असल्याने कुटुंबाला शेतीकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नव्हते. हंगामी पिके व ऊस ही पद्धती होती. पण अभय यांनी शेतीत लक्ष घालून अलीकडे तैवान पिंक पेरूची दीड एकरांवर लागवड केली आहे.

काजू प्रक्रिया उद्योग

पदविकेचे शिक्षण सुरू असताना अभय यांना काजू प्रक्रियेचा लघू प्रकल्प करण्याची संधी मिळाली. एमबीएची पदवी व उद्योगशील वृत्ती यातून उद्योजक व्हावे असे त्यांना वाटू लागले. सन २०१९ च्या दरम्यान पंढरपुरात छोटा काजू प्रक्रिया उद्योगही पाहण्यात आला. आणि तो डोक्यातही बसला.

वास्तविक त्यासंबंधी कोणती माहिती नव्हती. पण धाडस करायचे ठरविले. सर्वेक्षण व अभ्यासाअंती २०१९ मध्ये जुन्या यंत्रांच्या साह्याने उद्योगास सुरुवातही झाली. सुरुवातीला अपयश आले. मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले.

पुढच्याच वर्षी २०२० मध्ये कोरोनाचे संकट ओढवले. पण काहीही होवो, आता माघार नाही ही खूणगाठ मनाशी बांधून अभय पुन्हा कामाला लागले.

Cashew Processing Industry
Cashew Production : काजू फळपीक विकास योजनेचा लाभ घ्या

नव्या उमेदीने वाटचाल

कोरोना कालावधीत वेळ मिळाल्याने उद्योगातील अजून बारकावे जाणून घेतले. त्यातील ऑटोमेशन यंत्रणा, बाजारपेठा यांचा अभ्यास केला. सन २०२१ मध्ये नव्याने गुंतवणूक केली. पूर्ण तयारी आणि ताकदीनिशी पावले टाकण्यास सुरुवात केली. यात कच्चा माल सातत्याने मिळवत राहणे आव्हानाचे होते. अभय यांची बागही नव्हती. कोकणात काजू उपलब्ध होतो.

पण तो ठरावीक दोन-तीन महिने आणि जेमतेम. शिवाय वाहतूक खर्चासह अन्य तांत्रिक अडचणी होत्या. पण अभय यांनी जिद्दीने व्यापारी शोधण्यास सुरुवात केली.

घाना, व्हिएतनाम, टांझानिया आदी देशांमधून काजू भारतात आयात करणाऱ्या मंगळूर व अन्य भागांतील व्यापाऱ्यांशी बोलून हा प्रश्‍न सोडविला. आज वर्षभर काजू उपलब्ध होत आहे.

...असा आहे अत्याधुनिक प्रकल्प

-अधिकाधिक ऑटोमेशन तंत्रज्ञानाचा वापर. त्यात काजू बी स्वच्छ करण्यासह बॉयलर, स्टिमर, कटर, ड्रायर, पिलर (साल काढणारे यंत्र) आदींचा समावेश.

-दोन-तीन वर्षांत एक एक करत यंत्रांचा ‘सेट अप’ उभारला. त्यासाठी सुरुवातीपासून ते आजगायत सुमारे ७० लाख रुपयांची गुंतवणूक.

-२०२१ मध्ये प्रति दिन २०० किलो काजूवर होणारी प्रक्रिया २०२२ मध्ये ५०० किलो, तर आजमितीला एक टनांवर पोहोचली आहे.

-प्रक्रियेत सुरुवातीला कच्चा माल स्वरूपातील काजू बिया स्वच्छ केल्या जातात. त्यातून चांगल्या बिया निवडले जाते. बॉयलरमध्ये ठरावीक वेळेपर्यंत वाफेवर शिजवल्या जातात.

-थंड व वाळवण्यासाठी १६ तास मोकळ्या हवेत ठेवले जातात.

-त्यानंतर त्यावरील आवरण काढून आतील गुलाबी सालीसह असलेला काजू ऑटोमेशन यंत्राद्वारे वेगळा केला जातो.

-ड्रायरमध्ये ७० अंश सेल्सिअस तापमानात ६ ते ८ तासांपर्यंत ठेवला जातो.

-काजूवरील साल काढण्यासाठी त्याला ओलावा देण्यासाठी ‘मॅाइश्‍चर केबिन’ तीन तास ठेवला जातो. त्यानंतर ‘पिलिंग’ होते.

-यंत्राद्वारे प्रतवारी, त्यानंतर पुन्हा मजुरांकडून निवडणे, ड्रायरमध्ये दोन तास भाजून घेणे या पायऱ्या झाल्यानंतर स्वच्छ, चमकदार काजू मिळतो. होलसेल व्यापाऱ्यांना प्लॅस्टिक पिशव्यांमधून रवाना केला जातो.

आश्‍वासक उलाढाल

कच्चा माल वर्षभर उपलब्ध होत असल्याने वर्षभर उद्योग सुरू राहतो. मागणीनुसार नियोजन करून दर आठवड्याला सहा टनांपर्यंत प्रक्रिया होते. प्रतिदिन एक टनापर्यंत प्रक्रिया उद्दिष्ट असते. त्यापासून २५० किलो प्रक्रियायुक्त काजू मिळतो.

शेतातच प्रकल्प थाटला आहे. कच्चा माल उपलब्ध करण्यापासून ते विक्रीपर्यंत सर्व जबाबदाऱ्या अभय स्वतः पार पाडतातच. पण परिसरातील १५ मजुरांनाही रोजगार दिले आहेत. त्यात सर्वाधिक १२ महिला आहेत. उद्योगाची वार्षिक पाच-सहा लाख, ५५ लाख या प्रमाणे यंदा एक कोटीपर्यंत उलाढाल करण्याची मजल मारली आहे.

Cashew Processing Industry
Cashew Nut Processing Industry : कणकवलीच्या प्रणिता लाड यांनी काजू प्रक्रिया उद्योग केवळ सावरलाच नाही, तर विस्तारलाही!

परराज्यांपर्यंत बाजारपेठ

स्वच्छ, पांढऱ्याशुभ्र चमकदार काजूला सोलापूरसह पंढरपूर, पुणे, मुंबई या स्थानिक बाजारपेठांसह इंदूर, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली बाजारपेठेत होलसेल व्यापाऱ्यांकडून पसंती मिळते आहे. गुणवत्तेबाबत कोणती तडजोड केली जात नाही.

प्रति किलो ६५० ते ७५० रुपये दर मिळतो. येत्या काळात काजूसह ड्रायफ्रूट उत्पादने व ब्रॅण्ड तयार करून त्याची विक्री केंद्रे सुरू करण्याचा अभय यांचा प्रयत्न आहे.

संपर्क : अभय नागणे, ८८३०८३१९६३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com