
Pune News : आजपासून पुढील चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत मुंबईसह कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटे पाच वाजचे किमान तापमान भागानुसार सध्या सरासरीपेक्षा १ ते ४ अंशाने अधिक आहे. त्यामुळे तेथे माफक थंडी जाणवत आहे. पण मुंबईसह कोकणात मात्र हेच तापमान सरासरीपेक्षा १ ते २ अंशाने खालावले. यामुळे कोकणात त्यामानाने थंडी जाणवत आहे, असे हवामान विभागाने निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.
सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीसमोर दक्षिणोत्तर उभ्या लंबवर्तुळाकार समुद्री क्षेत्रात समुद्रसपाटीपासून दिड किलोमीटर उंचीपर्यंत अरबी समुद्रात असलेल्या आवर्ती चक्रीय वाऱ्याच्या स्थितीतून दक्षिणी वाहणाऱ्या वाऱ्यामुळे संपूर्ण कोकण, खानदेश आणि नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना अश्या एकूण १९ जिल्ह्यात अरबी समुद्रावरून प्रचंड आर्द्रता लोटली जात आहे.
त्यामुळे या १९ जिल्ह्यात पुढील चार दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत सकाळच्या वेळेस अभिवहनीय धुके पडण्याची शक्यता जाणवते. विदर्भासहित उर्वरित १७ जिल्ह्यात मात्र उत्तरी थंड व कोरड्या वाऱ्यातून तेथे माफक थंडी जाणवेल, असा अंदाजही खुळे यांनी व्यक्त केला.
धुक्याचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यापैकी जेंव्हा दमट हवा थंड पृष्ठभागावर तर थंड हवा दमट पृष्ठभागावर चलनवलनीय झाल्यास घडणाऱ्या सांद्रीभवनातून पडणाऱ्या धुक्यास अभिवहनीय धुके म्हणतात. उदा. जमीन व पाणी पृष्ठभागावर सकाळच्या वेळेस पडणारे धुके म्हणजे अभिवहनीय धुके असते. जेंव्हा पहाटेच्या किमान तापमानातील घट, निरभ्र आकाश, पाणसस्थळ भाग, समुद्र सपाटीपासुनची कमी उंची, आणि त्यावेळी त्या ठिकाणी असलेला शांत वारा व हवेचा उच्च दाब आणि वाढलेली सापेक्ष आर्द्रता ह्या स्थितीत सकाळी धुके पडते, असेही श्री. खुळे यांनी स्पष्ट केले.
धुक्यामुळे कांदा, गहू, हरबरा पिकावर कीड-रोगाचे आक्रमण होते. फुलोऱ्यातील पिकात परागीभवन व दाणाभरणीवर विपरित परिणाम होतो. प्रकाशसंस्लेषण अभावी कमी अन्नद्रव्ये पुरवठ्यामुळे पिके कोमेजतात. त्यांच्या वाढीवर, शाखीय डाफळणीवर विपरित परिणाम होतो. द्राक्षांच्या घड तयार होत असतांना दमट हवामानाचा विपरीत परिणाम जाणवतो. त्यामुळे ह्या चार दिवसात शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असेही आवहन त्यांनी केले.
२५ ते २९ डिसेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. ढगाळ वातावरणामुळे तापमानात अजून वाढ होवून ऊबदारपणा जाणवेल. त्यामुळे दरवर्षी नाताळ सणाला जाणवणारी तीव्र थंडी ह्यावर्षी जाणवणार नाही. मात्र वर्षाअखेरीस म्हणजे २९ डिसेंबरपासून हळूहळू थंडीत वाढ होऊन नववर्षाच्या उगवतीला पुन्हा थंडीची अपेक्षा आहे, असा देखील अंदाज श्री. खुळे यांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.