
Palghar News : दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये जमा होतात. खरीप हंगामासाठी पावसाळ्यापूर्वी दोन हजार रुपये मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.
मात्र अद्यापही जव्हार तालुक्यातील ११,७५४ शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे योजनेचा हप्ता कधी जमा होणार, याची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
केंद्र सरकारकडून दर चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात. यामध्ये कधीही खंड पडला नव्हता. पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता हा ३० मे रोजी जमा होणार होता. त्यामुळे हप्ता जमा झाला का, याची शेतकरी बँकेत चौकशी करतात;
परंतु आता २९ जून उजाडला, तरीही योजनेचा हप्ता जमा झाला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. सध्या खरीप हंगामासाठी खत, बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. गेल्या आठवड्यापासून मॉन्सूनने हजेरी लागल्याने पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे.
साहित्य खरेदीसाठी मदत
राज्य सरकारने पीएम शेतकरी योजनेच्या नियमानुसारच नमो शेतकरी महासन्मान योजनेतून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला; पण ती रक्कम लवकर मिळाल्यास खरीप पेरणी, बियाणे खरेदीसाठी उपयोगात येईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.
योजनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला सहा हजार रुपये जमा करणार असल्याचे सांगण्यात आले. काही दिवसांपूर्वीच सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेचा आदेश काढला आहे. यामुळे सरकारकडून योजनेची घोषणा होते; परंतु अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.