
Kolhapur News : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असणारी महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेमधून कोल्हापूर जिल्ह्यातील पीक कर्जाची नियमित परतफेड करणारे व योजनेप्रमाणे पात्र असणारे शेतकरी तांत्रिक कारणाने या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असून या योजनेअंतर्गत वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना लाभ द्यावा, अशी मागणी आमदार प्रकाश आबिटकर यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, की जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांची अंमलबजावणी सुरू आहे. जिल्ह्यातील २ लाख ९९ हजार शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला.
त्यामधील आजअखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीय व खासगी बँकांच्या १६९४६७ लाभार्थ्यांना या योजनेच्या माध्यमातून ६०८ कोटी रुपयांचा लाभ प्राप्त झाला. उर्वरित ६४ हजारांहून अधिक लाभार्थ्यांना लाभ मिळणे प्रलंबित असून शासकीय नोकर, प्राप्तीकर भरणारे व आर्थिक सक्षम अशा २१५५६ लाभार्थ्यांचे अर्ज अपात्र करण्यात आले आहेत.
या शेतकऱ्यांमार्फत वेळेत कर्जाची परतफेड केली जाते. यामुळे कोल्हापूर जिल्हा हा कर्ज परतफेडीमध्ये राज्यात आग्रेसर आहे. परंतु साखर कारखान्यांची बिले ही वेळेत जमा होत नाहीत. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आर्थिक वर्ष हे ३० जून आहे. या योजनेमध्ये १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश होतो.
जिल्ह्यातील शेतकरी केडीसीसी बँकेमध्ये खाते असणारे शेतकरी आपल्या कर्जाची परतफेड ३० जूनपर्यंत करत असतो. यामुळे केडीसीसी बँकेतील शेतकऱ्यांची कर्ज परतफेड २ वर्षांमध्ये दिसत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हे या योजनेपासून वंचित राहत असून या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून या योजनेचा लाभ देणे गरजेचे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.