
नागपूर ः ‘‘विदर्भाच्या अकोला, बुलडाणा व अमरावती या तीन जिल्ह्यांत विस्तारित खारपाणपट्टा, तसेच राज्याच्या काही भागांतील दुष्काळी गावे नजरेसमोर ठेवत नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्पाचा (POCRA Project) आराखडा तयार करण्यात आला होता. परंतु विदर्भातच या प्रकल्पाला अपेक्षित गती मिळाली नाही. तुलनेत मराठवाड्याने आघाडी घेतली आहे,’’ अशी माहिती ‘पोकरा’चे संचालक श्याम तागडे (Shyam Tagade) यांनी दिली. ('Pokra project lags behind in Vidarbha)
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशीम या जिल्ह्यांत त्यांनी योजनांची अंमलबजावणी आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात झालेले परिवर्तन या संबंधाने आढावा घेतला. या वेळी त्यांनी ‘ॲग्रोवन’सोबत संवाद साधला.
तागडे म्हणाले, ‘‘प्रकल्पाच्या अंमलबजावणीची जेमतेम दोन वर्षे उरली आहेत. वातावरणातील बदलामुळे शेतीक्षेत्रावर झालेला परिणाम व या बदलाच्या अनुकूल शेती पद्धतीला प्रोत्साहन देणे प्रकल्पात अपेक्षित आहे. त्यासाठी राष्ट्रीय मृदा सर्व्हेक्षण व जमीन उपयोग नियोजन संस्थेच्या सहकार्याने प्रकल्पात समाविष्ट गावांमध्ये पाणलोट व मातीचा अभ्यास करण्यात येत आहे. पाच हजार गावांत हे काम प्रगतिपथावर आहे. त्याव्दारे संबंधित गावांमध्ये कोणत्या प्रकारचे पीक फायदेशीर ठरेल, हे कळणार आहे. त्या पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन दिल्यास कमी उत्पादकता खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्य होईल. २०२४ पर्यंत हे काम पूर्णत्वास जाण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर गावांमध्ये पाणलोट व गावातील मातीचे गुणधर्म सांगणारे नकाशे लावले जातील.’’
सध्या शेतकरी कंपन्यांकडून अवजारे बॅंकांच्या उभारणीसाठी निधीची मागणी सर्वाधिक आहे. यातील बहुतांश कामांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. काही कंपन्यांकडून शेतमाल प्रक्रिया उद्योग व गोदाम उभारले आहेत. तागडे यांनी वाशीम जिल्ह्यात प्रकाश गायकवाड यांची सरी वरंबा सोयाबीन लागवड, जय योगेश्वर समूहाचे गोदाम बांधकाम, रवींद्र गायकवाड यांच्या फळबाग लागवडीची पाहणी केली. विभागीय कृषी सहसंचालक किसन मुळे, वाशीमचे अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार उपस्थित होते.
कृषिपंपांना हवा समावेश
प्रकल्पाची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. परंतु सध्या शेतकऱ्यांकडून शेळीपालन, पाणी उपशासाठी कृषिपंप व इतर काही जुन्या योजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. माहिती घेऊन या योजनांबाबत काही करता येईल का? याची चाचपणी केली जाणार असल्याचे तागडे यांनी सांगितले.
जुन्या योजनांचा होणार पुनर्विचार
जागतिक बॅंकेच्या निधीतून राबविण्यात येणारा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आहे. ५४ टक्के प्रकल्प निधी विविध योजनांच्या अंमलबजावणीवर खर्च झाला. काही जुन्या योजना पुन्हा प्रस्तावित कराव्यात, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. त्याचा आढावा घेत त्या संबंधाने निर्णय घेतला जाईल, अशी माहिती तागडे यांनी दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.