
सासवड : राज्य व केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘जलजीवन मिशन’ (jal Jeevan Mission) कार्यक्रमांतर्गत पुढील दोन वर्षांत पुरंदर तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्त्यांवरील प्रत्येक घरात नळाद्वारे पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा पुरवठा (Water Supply) होणार आहे. या योजनेत पुरंदर तालुक्यातील सर्व गावांचा समावेश करण्यात आला असून, ९२ गावांसाठी ३३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या योजनांसाठी सौरऊर्जेचा वापर होणार असल्याने वीजबिलांअभावी योजना बंद पडणार नाहीत, असा विश्वास पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिला. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदरमध्ये प्रातिनिधिक स्वरूपात पारगाव-माळशिरस आणि शिवरी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते नुकतेच झाले.
या वेळी माजी आमदार अशोकराव टेकवडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे, विजयराव कोलते, सुदामराव इंगळे, जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, पंचायत समिती सदस्या सुनीता कोलते, सोनाली यादव, गौरी कुंजीर, श्यामकांत भिंताडे, कात्रज डेअरीचे तानाजी जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील आदी उपस्थित होते.
‘‘पुरंदर उपसा योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांतील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दुषित झाले असून, नागरिकांना अनेक व्याधी जडल्या आहेत. त्यामुळे पिण्यासाठी दररोज विकतच्या जारच्या पाण्यावरच नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे.
यासाठी आम्ही लोकप्रतिनिधींनी या भागाचा सर्व्हे करून जारचे विकतचे पाणी बंद करण्यासाठी जलजीवन मिशनमधून पुरंदरमधील सर्व गावांचा समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला. पारगाव-माळशिरस आणि शिवरी प्रादेशिक योजनांच्या जलवाहिनीची लांबी ४४८ किमी, तर सर्व योजनांच्या जलवाहिनीची लांबी २६ हजार किमी आहे,’’ असे आमदार जगताप यांनी सांगितले. विकास इंदलकर यांनी सूत्रसंचालन केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.