
Heavy Rain Agriculture Damage : यावर्षी अगदी १५ जुलैपर्यंत कमी पावसाने राज्यातील शेतकरी हैराण होता. खरिपाचा पेरा निम्म्यावर होता. १५ जुलैनंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. लहान पिकांना जीवदानही मिळत होते. तोच २० जुलैपासून कोकण, मराठवाडा, विदर्भात पावसाने तांडवच सुरू केले.
२१ जुलैच्या रात्री तर मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. पाच ते सहा तास सतत कोसळणाऱ्या धारांनी नांदेड, हिंगोली, यवतमाळ, बुलडाणा, अकोला जिल्ह्यांतील बहुतांश नद्यांना आलेल्या पुराने अनेक गावांना वेढा पडला.
अचानक आलेल्या महापुरात काही शेतकरी-शेतमजूर वाहून गेले. नदी-नाल्यांच्या पुरात पिकांसह सुपीक माती वाहून गेली. पावसाचा मार एवढा होता की पूर न आलेल्या शेतांमधील पिकेदेखील उन्मळून पडली. पुरात अडकलेल्या अनेक गावांतील लोकांना वाचविण्यासाठी या भागात तरी प्रथमच हवाई दलाच्या हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली.
‘एनडीआरएफ’च्या पथकांमार्फत बोटीच्या साह्याने अनेकांची सुटका करण्यात आली. पूरग्रस्त अनेक गावांत बहुतांश शेतकऱ्यांना दुबार पेरणीशिवाय आता पर्याय नाही. वारंवारच्या नैसर्गिक आपत्तींनी शेतकरी आर्थिक-मानसिकदृष्ट्या कोलमडून पडले आहेत. अशा वेळी या शेतकऱ्यांना आधी उभे करावे लागेल.
महापुरानंतर पाहणी-पंचनामे-मदतीच्या घोषणा- निधी मंजुरी-प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत यांत बराच कालावधी जातो. या कामांत शासनाकडून प्रचंड राजकारण तर प्रशासन पातळीवर तेवढाच ढिसाळपणा दिसून येतो. त्यातून अनेक पूरग्रस्त वंचित राहतात. मिळालेली मदतही तुटपुंजी असते, ती फार उशिराने देखील मिळते.
त्यामुळे आता खरीप हंगाम पेरणीचा काळ संपत आला असताना एखाद-दुसऱ्या पिकाची पेरणी करण्याकरिता या कोणत्याही प्रक्रियेत न पडता शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत करावी लागेल. ही मदत देत असताना कृषी विभागाने आता कोणती पर्यायी पिके घेता येतील, याबाबत मार्गदर्शन करायला हवे.
खरीप पेरणीचा काळ उलटून गेल्याने शेतकरी संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे लेट खरीप किंवा अर्ली रब्बीसाठी शेतकऱ्यांना मदत-मार्गदर्शन झाले पाहिजेत. अशा तत्काळ मदतीनंतर सर्व नुकसानग्रस्तांना सरसकट हेक्टरी मदतही लवकरात लवकर मिळेल, याची काळजी घेतली पाहिजे.
शेतकऱ्यांना मदत करताना केवळ एका हंगामाचे नुकसान या नजरेतून न पाहता अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पुराने खरवडून गेल्या आहेत. अशा शेतकऱ्यांना जमीन दुरुस्तीसाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो. नुकसानीची अशी तीव्रता पाहून देखील शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे.
हवामान बदलाच्या काळात सलग पाच-सहा तासांहून अधिक काळ झालेल्या अतिवृष्टीने ही पूरपरिस्थिती उद्भवली असली, तरी मानव निर्मित काही कारणेदेखील पुराची तीव्रता वाढविण्यास जबाबदार आहेत. शेताच्या बांध, नदी-नाल्याचे काठ ते डोंगरमाथ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे.
शेताला पूर्वीसारखे भक्कम बांध उरले नाहीत. मूलस्थानी जलसंधारणापासून ते बांधबंदिस्ती आदी कामे इतिहासजमा झाली आहेत. शेतात सेंद्रिय खतांच्या अभावाने जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण कमी आहे. डोंगरमाथ्यावर कुठे चर अथवा मृद्- जलसंधारणाची कामे दिसत नाहीत.
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नदी-नाले नांगरण्याची अशास्त्रीय कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. अनेक ठिकाणी शेतातील ओहोळ, नाले बुजवून तेथे शेती केली जात आहे. सर्वच नद्यांतून अवैध वाळूउपसा चालू आहे. या सर्वांच्या परिणामस्वरूप पुराची तीव्रता वाढून त्यात नुकसानही वाढत आहे.
शेतांच्या बांधबंदिस्तीपासून ते पाणलोट क्षेत्रात माथा ते पायथा मृद्- जलसंधारणाचे शास्त्रीय उपाय केले तर ३० ते ४० टक्के पाणी तिथे आडून जमिनीत मुरू शकते. पाणलोटनिहाय एवढे पाणी नदी-नाल्यात कमी आल्यास पुराची तीव्रता निश्चितच कमी होणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.