
Indian Agriculture: भारतीय कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंचे ४८ वे अधिवेशन कुमारगंज अयोध्या येथे नुकतेच पार पडले. या अधिवेशनाची प्रमुख संकल्पनाच भारतामध्ये कृषी पर्यटन - शिक्षण व ग्रामीण विकास यांच्यातील दुवा, ही होती. भारतात महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम कृषी पर्यटनाची संकल्पना मांडली. कृषी पर्यटनाला चालना देणारे धोरण आणले. राष्ट्रीय स्तरावर या उपक्रमांची प्रशंसा होते. या अधिवेशनामुळे कृषी पर्यटनासंबंधी नव्या संधींबाबत जाणीवजागृती निर्माण होऊन ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासात सकारात्मक बदल घडेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
आज आपण पाहतोय तोट्याच्या शेतीमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उदासीनता आहे. शेतीत पैसा आणि प्रतिष्ठा हे दोन्ही उरले नाही. त्यामुळे शेती सोडून शहरात काहीतरी रोजगार मिळेल म्हणून शेतकरी कुटुंबांचे स्थलांतर वाढत आहे, तर शेतीत टिकून असणारे शेतकरीसुद्धा पर्यायी व्यवसायाच्या शोधात आहेत. अशा सर्व शेतकऱ्यांना आपल्या गावातच कृषी पर्यटनाच्या माध्यमातून एक चांगला व्यवसाय उभा करता येऊ शकतो.
मोठ्या शहरांतील वाढती वर्दळ, प्रदूषण, वाढता मानसिक ताण कमी करण्यासाठी अनेकांची पावले निसर्ग पर्यटनाकडे वळताहेत. त्यातही आता प्रस्थापित निसर्ग पर्यटनस्थळांवर गर्दी वाढत असल्याने गावातील निसर्ग आणि शांत ठिकाणी असलेल्या कृषी पर्यटनाला अनेक जण प्राधान्य देत आहेत.
कृषी पर्यटनातून शेतीमध्ये गुंतवणूक वाढते. विविध भागांतील पर्यटकांमुळे गावात पैसा येतो. शेतीमाल तसेच गावातील बचत गटांतील महिलांच्या उत्पादन विक्रीसाठी नवीन दालन खुले होते. गावातील तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतात. शेतीला प्रतिष्ठा मिळवून देणारा हा व्यवसाय आहे. अशावेळी भारतातील प्रत्येक राज्यात देखील हा उद्योग लोकप्रिय ठरून कृषिपूरक नव्हे, तर मुख्य व्यवसाय म्हणूनही स्थापित होऊ शकतो.
कृषी पर्यटन म्हणजे खेड्यात किंवा शेतात जाऊन राहणे व तिथल्या अन्नावर ताव मारणे एवढेच मर्यादित अर्थाने घेऊ नये. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, स्थानिक हस्तकला आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना देता येऊ शकते, अशा व्यापक दृष्टिकोनातून या व्यवसायाकडे पाहायला हवे.
सध्या काही मोठ्या शहरांलगतच्या गावांतच कृषी पर्यटन केंद्रे वाढत आहेत. याची व्याप्ती आणि विस्तार आपल्याला देशाच्या ग्रामीण भागात पोहोचवावा लागेल. महाराष्ट्रासह देशभर धार्मिक, ऐतिहासिक स्थळे विखुरलेली आहेत. काही गावच्या यात्रा-जत्रा प्रसिद्ध आहेत. विशिष्ट काळात अशा ठिकाणी भाविकांची गर्दी होते आणि तिथल्या सोयीसुविधांवर ताण येतो. अशावेळी धार्मिक पर्यटनस्थळांना कृषी पर्यटनाची चांगली जोड मिळू शकते. कृषी पर्यटनातील संधी लक्षात घेऊन तरुणांनी कल्पकतेतून हा व्यवसाय सुरू करायला हवा.
कृषी पर्यटनासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शनाची आवश्यकता असून, कृषी, पर्यटन आणि ग्रामविकास या विभागांनी याकरिता पुढाकार घ्यायला हवा. कृषी पर्यटनात सुरुवातीला पैसा गुंतवावा लागतो. अशावेळी बॅंकांकडून सवलतीच्या दरात कर्जपुरवठा व्हायला हवा.
कृषी पर्यटनासाठीच्या पायाभूत सुविधा शासनाने पुरवायला हव्यात शिवाय पर्यटकांसाठीच्या सोयीसुविधांसाठीचे परवाने-प्रमाणपत्रांची प्रक्रिया सुलभ करायला हवी. शेतकऱ्यांबरोबर उत्पादक कंपन्यासुद्धा आपला परिसर कृषी पर्यटन केंद्र म्हणून विकसित करू शकतात. कृषी पर्यटनासाठी सर्वसमावेशक असे राष्ट्रीय धोरणही हवे. असे झाले तर देशभर कृषी पर्यटनाला चालना मिळेल, हा व्यवसाय अधिक शाश्वत होऊन ग्रामीण अर्थकारणाला गती मिळेल.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.