
‘‘राज्यातील सरकार कायदेशीर आहे की बेकायदेशीर, हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल. मात्र मागच्या सरकारच्या सर्वच निर्णयांना स्थगिती देणे, निधी अडवणे बरोबर नाही. यापूर्वी असे कधीही झाले नाही. अतिवृष्टीमुळे (Wet Drought) शेतकरी मेटाकुटीस आलेला असताना पंचनामे होत नाहीत. इतरही कामे ठप्प आहेत. त्यांच्यात मेळ नसल्यानेच पालकमंत्री ठरत नाहीत,’’ अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली. ‘‘पुढे काय काय होते ते पाहा,’’ असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
नगर येथे जिल्हा सहकारी बँकेच्या वार्षिक सभेनंतर शुक्रवारी (ता.१६) पत्रकारांसोबत संवाद साधला. थोरात म्हणाले, ‘‘अडीच महिने झाले तरी काहीच ठोस नाही. त्यामुळे कुठे आहे सरकार, असे म्हणण्याची वेळ आली आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांचा निधी थांबवणे म्हणजे तुम्ही जनतेची कामे अडवीत आहात. कोण दमबाजी करतेय, कोण रिव्हॉल्व्हर काढतेय, काय चाललेय तुम्हीच सांगा. सरकार पाडून सत्ता मिळवल्यापासून यांचे सत्कार सोहळेच सुरू आहेत. ते थांबायचे नाव घेत नाहीत.’’
‘‘वेदांताच्या व्यवस्थापनाची महाराष्ट्रात तळेगावला येण्याची इच्छा होती. आमच्या सरकारच्या काळात सर्व व्यवस्थित होते. या अडीच महिन्यांत असे काय घडले, की त्यामुळे वेदांताला गुजरात सोयीचे वाटू लागले. ऑपरेशन लोटसमध्ये उद्योग-धंदे पळवणे हाही अजेंडा होता काय,’’ असा सवाल थोरात यांनी केला.
‘‘राज्यात दुसऱ्या पक्षातील लोक कशा पद्धतीने फोडली जातात, हे आपण सर्व जाणता. या विषयावर तुम्हीच विश्लेषण करा,’’ असेही त्यांनी सांगितले. ‘‘काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याबाबत तर मीडियातूनच ऐकायला-वाचायला मिळते,’’ असे उत्तर त्यांनी दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.