
Amravati News : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ६० हजार हेक्टरच्या जवळपास क्षेत्रातील पीक वाया गेले आहे. या जमिनीवर आता खरीप हंगामात दुबार पेरणीही करता येणे शक्य नसल्याने ती पडीक राहणार आहे. आता या क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात संधी मिळू शकणार आहे.
जिल्ह्यात जुलै महिन्यात तब्बल आठ ते नऊ वेळा विविध महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली आहे. पावसाच्या पुराचे पाणी शेतात शिरून सखल भागातील शेतात ते साचून राहिले. तर काही भागातील जमीन खरडून गेली.
यंदा मॉन्सून विलंबाने आल्याने पेरण्याही विलंबाने झाल्या. जुलै महिन्यातच पेरण्यांना वेग आला होता, तर जून महिन्यात बागायती शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या. जूनमधील पावसाची तूट जुलैमध्ये भरून निघाली असली तरी त्याने नुकसानही झाले.
जिल्ह्यात एकूण ६ लाख ८२ हजार १४७ हेक्टर सरासरी पेरणी क्षेत्रापैकी ६ लाख ४५ हजार ७३८ हेक्टरमध्ये पेरणी आटोपली आहे. पेरणीची सरासरी ९४ टक्के आहे. १५ जुलैपर्यंत पेरणी करणे शक्य असल्याने शेतकऱ्यांनी त्यासाठी लगबग केली. १ लाख ८ हजार १३८ हेक्टरमध्ये तूर २ लाख ४८
हजार ९४९ हेक्टरमध्ये सोयाबीन व २ लाख ५८ हजार ४४० हेक्टरमध्ये कापसाची पेरणी झाली आहे. सध्या ही सर्व पिके अंकुरलेली असताना पावसाने कहर केला व पिकांना तडाखा बसला. जिल्ह्यातील ५७ हजार ८१७ हेक्टर क्षेत्रातील पिके नष्ट झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यातील ३२६ हेक्टर जमीन पूर्णतः खरडून गेली आहे. या जमिनीवर आता दुबार पेरणी करणे अशक्य असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पेरणीच्या ९ टक्के क्षेत्र खरीप हंगामात नापेर राहणार आहे. या क्षेत्रातील कापूस, सोयाबीन व तूर या पिकांसह इतर पिकांची हानी झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.