
लातूर : ‘‘टोमॅटोचे दर कमी झाली. महाराष्ट्रातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना एकरी किमान ५० हजार रुपयाचे अनुदान द्यावे,’’ अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांनी दिली.
मागणीसंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविल्याचे नागरगोजे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार सध्या टोमॅटोचे दर मोठ्या प्रमाणावर कोसळला. त्यामुळे राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. सध्या मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या टोमॅटोच्या २५ ते ३० किलोच्या कॅरेटला ८० ते १०० रुपयांचा भाव मिळत आहे. म्हणजेच २ ते ३ रुपये किलो, असा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. टोमॅटोचा एकरी उत्पादन खर्च हा १ लाख रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तर लांबच सध्याच्या भावात वाहतूक व तोडणीचा खर्चही निघत नाही, अशी स्थिती आहे.
बहुतांश शेतकरी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहेत, अथवा गुराढोरांना खायला टाकत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकारने उभे राहावे. शेतकऱ्यांचे पंचनामे करून त्यांना एकरी किमान ५० हजार रुपयांची मदत शासनाने देऊन त्यांना दिलासा द्यावा. पणन मंडळाद्वारे सरकारने प्रतिकिलो १० रुपये दर निश्चित करावी. मागणी असलेल्या राज्याबाहेरील बाजार समित्यांमध्ये टोमॅटो पाठवावे. जेणेकरून, दरामध्ये सुधारणा होईल. राज्य सरकार काहीच मदत शेतकऱ्यांना करत नाही, अथवा या प्रश्नावर बोलतही नाही, हे न उलगडणारे कोडे असल्याचेही निवेदनात नमूद आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.