
नांदेड : आज शिक्षणामध्ये नवे तंत्रज्ञान वाढत आहे. पण तंत्रज्ञान कितीही वाढले तरी शिक्षण अधिक चांगले करणे ही सामूहिक जबाबदारी आहे. देशात मातृभाषेतून इंजिनिअरिंग सुरू होणे ही आश्वासक बाब आहे. मातृभाषेतून शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेविषयीचा अभिमान जागा होईल. विद्यार्थ्यांमध्ये समर्पणाची भावना निर्माण करण्यासाठी मातृभूमी व मातृभाषेविषयीचा अभिमान जागा करा, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील सिनेट सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले व प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन उपस्थित होते. राम-कृष्ण यांच्याप्रमाणेच श्री गुरू गोविंदसिंग हे मला सदैव प्रात:स्मरणीय आहेत. त्यांचे निर्वाण या भूमीत झाले. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या संतांची भूमी आहे. त्यामुळे हे स्थान प्रेरणादायी असे सांगून नवे शैक्षणिक धोरण हे नव्या भारताच्या निर्माणासाठी आहे. या धोरणाचा प्राध्यापक व संशोधकांनी अभ्यास करून त्या दिशेने वाटचाल करावी. येणाऱ्या काळात स्टार्टअप स्वंयरोजगार याविषयी विद्यार्थ्यांना अधिक जागरूक करावे, असेही ते म्हणाले.
या वेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठातील विविध शैक्षणिक उपक्रमांची विस्तृतपणे माहिती दिली. या वेळी राज्यपाल कोश्यारी यांनी उपस्थित प्राध्यापकांशी थेट संवाद साधला. विद्यापीठातील विविध संकुलांतील वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाविषयी व प्राध्यापकांच्या अडचणी याबाबत माहिती जाणून घेतली. चर्चेत डॉ. राजाराम माने, डॉ. जगदीश कुलकर्णी, डॉ. घनश्याम यळणे, डॉ. गजानन झोरे, डॉ. सिंकू कुमार सिंह, व्यवस्थापन परिषद सदस्य परमेश्वर हासबे आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या आरंभी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.