आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः जिल्हाधिकारी ठाकरे

गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन जिल्ह्यातील पुराचा धोका असणाऱ्या सर्व ३४१ गावांना कोणताही धोका पोहोचणार नाही, अशा पद्धतीचे सुसज्ज नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले.
Plan Disaster Management: Collector Thackeray
Plan Disaster Management: Collector Thackeray
Published on
Updated on

नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन जिल्ह्यातील पुराचा धोका असणाऱ्या सर्व ३४१ गावांना कोणताही धोका पोहोचणार नाही, अशा पद्धतीचे सुसज्ज नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले. 

बैठकीचे प्रास्ताविक जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे यांनी केले. जिल्हाधिकारी ठाकरे यांनी या वर्षीचे सर्व विभागाचे नियोजन पुढील सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश दिले. 

गेल्या वर्षी २८ व २९ ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील चौराई धरणाच्या ग्रहण क्षेत्रात काही तासांमध्ये ४१४ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्यामुळे चौराई धरणातून ९८ टक्के भरलेल्या तोतलाडोह धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आले. तोतलाडोहचा विसर्ग वाढविणे आवश्यक असल्याने गेल्या तीनशे पंधरा वर्षांत आला नसेल इतका भयानक पूर नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी, मौदा, सावनेर तालुक्याने बघितला. सुदैवाने प्रशासनाच्या जागरूकतेने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रचंड वित्तहानी झाली. त्यामुळे या वर्षी माॅन्सूनपूर्व तयारी करताना गेल्या वर्षी जे घडले ते पुन्हा घडणार नाही, अशा पद्धतीचे नियोजन करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्‍यांनी केली. 

या बैठकीला जिल्हाधिकारी कक्षातून जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे यांच्यासह आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या ऑनलाइन बैठकीला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, होमगार्ड, पोलिस, स्वयंसेवी संस्था, रेड क्रॉस आदी उपस्थित होते. 

हवामान खात्याने या वर्षी ९६ ते १०४ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच १५ जूनपर्यंत नागपूरला माॅन्सूनचा पाऊस सुरू होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात सर्व नियोजन पूर्ण करायचे असून, त्यासाठी सर्वप्रथम त्यांनी जिल्ह्यातील पाच मोठ्या व १२ मध्यम प्रकल्पाचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करावे, यासोबतच लघू प्रकल्प, तसेच तलाव बंधारे याबाबतही काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे. 

नागपूर जिल्ह्यामध्ये १९९१ मध्ये मोवाड येथील दुर्घटना व त्यानंतर गेल्या वर्षी २८ व २९ ऑगस्ट रोजी आलेला महापूर, या ताज्या घटना आहे. त्यातून धडा घेत नव्याने नियोजन झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. सोमवारी (ता. १७) मध्य प्रदेशातील आपत्ती व्यवस्थापनातील अधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात एक बैठक होत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मध्य प्रदेशातून येणाऱ्या नद्यांवरील धरणातील पाण्याचा विसर्ग व अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी नागपूर भंडारा जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहे. गेल्या वेळी २८ हजार पूरग्रस्तांना हलविण्यात आले होते. त्यामुळे संपर्क व्यवस्था अतिशय मजबूत ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

बोटी, लाइफ जॅकेट, प्रशिक्षित मणुष्यबळ यंत्रसामग्री तपासून तयार ठेवणे, कोरोनासह अन्य संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरोग्य विभागाने दुर्गम गावांपासून सर्वत्र उपायोजना करणे, वीज पडून मृत्युमुखी पडणार नाही यासाठी जनजागृती मोहीम राबवणे, सर्व मोठ्या मध्यम, लघू, प्रकल्प व जिल्ह्यातील तलावांचे परीक्षण करणे, जिल्ह्यातील संपूर्ण ३४१ गावांमध्ये आवश्यक संपर्क यंत्रणा व सतर्कता ठेवण्याची यंत्रणा बळकट करण्याची सूचना त्यांनी केली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com