लखीमपूर खेरीतील हिंसाचार जालियनवालाबागेसारखा : शरद पवार

शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराची तुलना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे.
लखीमपूर खेरीतील हिंसाचार जालियनवालाबागेसारखा : शरद पवार
लखीमपूर खेरीतील हिंसाचार जालियनवालाबागेसारखा : शरद पवार

नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराची तुलना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली आहे. ‘सरकारच्या विरोधात आंदोलन झाल्यास कठोर कारवाई होईल हे दर्शविण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. जालियनवाला बागेमध्ये जी स्थिती निर्माण करण्यात आली होती. तशी स्थिती आज उत्तरप्रदेशात दिसते आहे. याची जबरदस्त किंमत सरकारला चुकवावी लागेल.’ असा सज्जड इशारा पवार यांनी मंगळवारी (ता.५) दिला.  पवार यांनी आज दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या हत्येबाबत किमान दुःख व्यक्त करण्याची संवेदनशीलता केंद्रातील आणि उत्तर प्रदेशातील सरकारने दाखविलेली नाही, असा प्रहारही त्यांनी केला. तसेच या घटनेमागचे सत्य समोर येण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फतच चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. पवार म्हणाले की, ‘‘ लोकशाहीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार शेतकऱ्यांना आहे. हा अधिकार बजावण्यासाठी लखीमपूर खेरी येथे शेतकरी एकत्र आले होते. केंद्र आणि उत्तर प्रदेशात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या लोकांनी शेतकऱ्यांना हटविण्यासाठी त्यांच्या अंगावर गाडी घातली. यात शेतकरी मरण पावले. याची संपूर्ण जबाबदारी दिल्लीत आणि उत्तरप्रदेशात सत्तेत असलेल्यांची आहे. शेतकऱ्यांवरील हा हल्ला निषेधार्ह आहे. याचा केवळ निषेध पुरेसा नसून संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी. उत्तरप्रदेश सरकारने निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची घोषणा केली आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश यांच्यामार्फतच चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावे.’’ 

शेतकरी उत्तर देतील  ‘‘ शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलनाचा अधिकार बजावत असताना त्यांच्यावर झालेला हल्ला भारत सरकारची नियत स्पष्ट करणारा आहे. सत्तेचा गैरवापर करून शेतकऱ्यांचा आवाज दडपण्याचा सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही. उत्तरप्रदेशातीलच नव्हे तर देशातील शेतकरी यावर सरकारला उत्तर देतील.’’ असा इशारा पवार यांनी दिला. शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी छत्तीसगडचे मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री यांना लखीमपूरला जाऊ दिले नात नाही, दिल्लीच्या नेत्यांना रोखले जाते. हा सत्तेचा गैरवापर आहे अशी टीकाही पवारांनी केली. शेतकरी एकटे नसून विरोधी पक्षातील सर्व नेते त्यांच्यासोबत आहेत, अशी ग्वाही पवार यांनी दिली. 

ही तर सरकारची दडपशाही  ‘‘केंद्रातील असो की उत्तरप्रदेशातील सरकार संवेदनशील नाही. शेतकऱ्यांची हत्या होते त्यावर किमान दुःख व्यक्त करण्याची गरज असते, तशीही त्यांची तयारी नाही. सरकारच्याविरोधात आंदोलन झाले तर खपवून घेतले जाणार नाही, त्याविरुद्ध कठोर कारवाई करू हे दाखविण्याचा प्रयत्न चालला आहे. जालियनवाला बागेमध्ये जशी स्थिती निर्माण करण्यात आली होती. तशी स्थिती आज उत्तरप्रदेशात दिसते आहे. याची जबरदस्त किंमत सरकारला आज नाही तर उद्या चुकवावी लागेल.’’ असा इशारा पवार यांनी दिला. 

प्रतिक्रिया... आजी माजी खासदार, नेते, पंजाबचे मुख्यमंत्री असो किंवा अन्य मुख्यमंत्री असो या सर्वांना जी वागणूक दिली आहे तो प्रकार लोकशाहीच्या मूलभूत अधिकाराची हत्या करणारा आहे. यात सरकारला यश मिळणार नाही. यात लोक सरकारला आपली जागा दाखवून देतील. तसेच या मुद्यावर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह अन्य कोणाशीही आपले बोलणे झालेले नाही.  - शरद पवार, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com