

केळघर, जि. सातारा : मेढा, केळघर विभागातील ५४ गावांसाठी महत्त्वाच्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न प्रशासन जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवत आहे. त्यामुळे २३ मार्च रोजी हुतात्मा दिनाचे औचित्य साधून श्रमिक मुक्ती दल व धरण कृती समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५४ गावांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांनी रविवारी (ता.२७) दिला.
नांदगणे येथे कृती समितीच्या वतीने डॉ. पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांची बैठक झाली. कृती समितीचे निमंत्रक विजयराव मोकाशी, जावली सहकारी बँकेचे अध्यक्ष राजाराम ओंबळे, उद्योजक राजेंद्र धनावडे, आदिनाथ ओंबळे, विजयराव सावले, एकनाथ सपकाळ, विनोद शिंगटे, राजेंद्र जाधव, धनश्री शेलार, उषा उंबरकर, विद्या सुर्वे, वैशाली पवार आदींची उपस्थिती होती.
डॉ. पाटणकर म्हणाले, ‘‘दुष्काळी तालुक्यांना पाणी मिळण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाने संघर्ष करून यश मिळविले आहे. त्याचप्रमाणे बोंडारवाडी धरणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी ५४ गावांतील ग्रामस्थांना सोबत घेऊन निर्णायक लढा उभारणार आहे. धरण मिळवू अन्यथा बलिदान करू, या ध्येयाने प्रेरित होऊन २३ मार्च रोजी आयोजित ठिय्या आंदोलनात ५४ गावांतील सर्वांनी तयारीनिशी उपस्थित राहावे.’’
मोकाशी म्हणाले, ‘‘प्रशासनासोबत २५ नोव्हेंबरला सातारा येथे झालेल्या बैठकीत प्रस्तावित बोंडारवाडी धरणात पिण्यासाठी व शेतीसाठी उपलब्ध करून देऊ, असे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, त्यावर ठोस कार्यवाही न झाल्याने ५४ गावांत गावोगावी बैठका घेऊन धरण होण्याबाबत कृती समिती भूमिका पटवून देणार आहे. आता सर्व तयारीनिशी २३ मार्च रोजी होणारे ठिय्या आंदोलन यशस्वी करणार आहे.’’ एकनाथ सपकाळ यांनी सूत्रसंचालन केले. विजयराव सावले यांनी आभार मानले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.