रत्नागिरी : तालुक्यातील शीळ-सड्यावर वणव्याच्या भडक्यात २५ एकर परिसरातील सुमारे १ हजार १२५ आंबा, काजूची कलमे जळून खाक झाली. यामध्ये चार बागायत दारांचे सुमारे ४५ लाखाचे नुकसान झाले आहे. स्थानिकांच्या प्रयत्नाने काही तासांत ही आग आटोक्यात आणली. ३३ केव्हीची मुख्य विद्युत वाहिनीमध्ये शॉर्टसर्किंट होऊन ही आग लागल्याचा अंदाज आहे.
तालुक्यातील शिळ-सडा येथे मंगळवारी (ता. २३) दुपारी अचानक वणवा पेटला आणि काही क्षणात या वणव्याने रौद्ररूप धारण केले. सुमारे २५ एकर परिसरात हा वणवा पसरला आणि त्यात आंबा-काजूची झाडे भस्मसात झाली. ही आग या परिसरातून जाणाऱ्या विद्युत वाहिनीवर झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे.
राजेश तिवारी यांच्या ५५० आंबा कलमांचे सुमारे ३० लाखांचे नुकसान झाले आहे. विजय करंदीकर यांच्या २०० कलमांचे २० हजारांचे, सुविधा मांडवकर आणि कामेरकर यांची काजूची ३०, तर आंब्याच्या ५५ कलमांचे २ लाखाचे नुकसान झाले आहे. दत्ताराम देसाई यांची काजूची २७० कलमे जळून खाक झाल्याने त्यांचे १२ लाखाचे नुकसान झाले आहे. वणव्यामध्ये एकूण १ हजार १२५ कलमे जळून खाक झाली. स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आली.
राजेश तिवारी यांच्या बागेतून महावितरणची ३३ केव्हीची उच्च दाब वाहिनी गेली आहे. त्यातील तीन खांब यांच्या बागेत असून, त्यावर शॉर्टसर्किंट होऊन ठिणगी पडून आग लागल्याचा अंदाज आहे, तसे पंचनाम्यात नमूद करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी महसूल विभागाकडून या बागांचे पंचनामे झाले असून, त्यामध्ये नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी बागायतदारांनी केली आहे. मिरजोळे सरपंच संदीप नाचणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे. नुकसानीबाबत तातडीने तहसीलदार शशिकांत जाधव यांच्या प्रयत्नाने पंचनामे झाले आहेत
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.