मराठवाड्यातील पावसाच्या वार्षिक सरासरीत बदल

राज्यातील तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमान निश्चित आहे. वर्षानुवर्षे त्याची आकेडवारीही शासनाच्या जाहिर करण्यात येते. पण आता पुण्याच्या हवामान खात्याने ५० वर्षांचा अभ्यास करून आता जिल्हा व तालुकानिहाय वार्षिक पावसाची सरासरी नव्याने काढली आहे.
rain
rain
Published on
Updated on

लातूर ः राज्यातील तालुक्यांचे सरासरी पर्जन्यमान निश्चित आहे. वर्षानुवर्षे त्याची आकेडवारीही शासनाच्या जाहिर करण्यात येते. पण आता पुण्याच्या हवामान खात्याने ५० वर्षांचा अभ्यास करून आता जिल्हा व तालुकानिहाय वार्षिक पावसाची सरासरी नव्याने काढली आहे. चौदा वर्षात पहिल्यांदाच हा बदल करण्यात आला आहे. यात मराठवाड्याची पावसाची वार्षिक सरासरी ३५ मिलीमीटरने वाढली आहे. यात सर्वाधिक परभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी १२८ मिलीमीटरने वाढली आहे. तर उस्मानाबादची सरासरी मात्र साडे सोळा मिलीमीटरने कमी झाली आहे. 

दरवर्षी मान्सून कालावधीत शासनाकडून तयार करण्यार येणारे पर्जन्यमानाचे अहवाल तसेच विभागीय आयुक्तांकडे तयार करण्यात येणारे अहवाल हे सरासरी पर्जन्यमानाच्या आधारे तयार केले जातात. यासाठी शासनाने विहित केलेली जिल्हा व तालुकानिहाय पर्जन्यमानाची सरासरी आकडेवारी विचारात घेतली जात होती. पण ही वार्षिक सरासरी जुन ते आक्टोबर या चार महिन्याची राहत असे. आता मात्र शासनाने वर्षभर पावसाळा धरला आहे. प्रत्येक महिन्यात ठराविक पाऊस ग्रहित धरून वार्षिक सरासरीची आकडेवारी काढली आहे. यामुळे पावसाळ्यात कमी पाऊस पडला तरी त्याची टक्केवारी मात्र जास्त दिसून येणार आहे. 

पन्नास वर्षाच्या पावसाचा अभ्यास  राज्यात सरासरी पर्जन्यमान निश्चित केलेल्या कार्यवाहीस १४ वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे. त्यामुळे राज्यातील तालुकानिहाय, जिल्हानिहाय, महिनानिहाय सुधारित सरासरी पर्जन्यमान निश्चित करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे पुण्याच्या हवामान खात्याने १९६१ ते २०१० या कालावधीतील  तालुकानिहाय दैनंदिन पर्जन्याचा अभ्यास करून राज्यातील जिल्हानिहाय, तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमान निश्चित केले आहे. आता याला शासनाने मान्यता दिली आहे. 

परभणीची सरासरीत मोठी वाढ  मराठवाड्यातील पावसाची वार्षिक सरासरी ७७९ मिलीमीटर होती. आता नवीन आकडेवारीनुसार ती ८१४.१८ मिलीमीटर झाली आहे. म्हणजेच ३५.१८ मिलीमीटरने वाढली आहे. यात सर्वाधिक वाढ परभणी जिल्ह्याची असून ती १२८ मिलीमीटर आहे. उस्माबाद जिल्ह्याची वार्षिक सरासरीची आकडेवारी १६.५१ तर नांदेड जिल्ह्याची ८.१४ मिलीमीटरने घट झाली आहे. लातूर जिल्हा ५८.७७, औरंगाबाद २१.५४, जालना ३३.३९, बीड ३२.९४, हिंगोली जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी आकडेवारी ३०.८४ ने वाढली आहे. 

दुष्काळाग्रस्त मराठवाड्याला फटका?  या पुढील काळात आता नवीन वार्षिक सरासरीचीच आकडेवारी ग्रहित धरली जाणार आहे. पर्जन्यविषयक अहवाल तयार करण्यासाठी हीच आकडेवारी वापरली जाणार आहे. इतकेच नव्हे तर दुष्काळाचे मुल्यांकन करण्यासाठी देखील याच आकडेवारीचा वापर केला जाणार आहे. या आकडेवारीसाठी ५० वर्षाचा अभ्यास केला आहे. पण यात २०११ पासूनच्या पावसाचा विचार केलेला नाही. तीस चाळीस वर्षापूर्वी पावसाचे प्रमाण आतापेक्षा जास्त होते. जास्त दिवस पाऊस पडत होता. पाणी पातळी वर होती. शेतीचा पॅटर्न वेगळा होता. गेल्या दहा पंधरा वर्षात सर्वच बदलले आहे. महिना महिना पाऊस पडत नाही. वर्षातून काही तासच पाऊस पडत आहे. मराठवाड्यातील काही भागात सहाशे सातशे फुट खोल गेले तरी पाणी लागत नाही. अशी परिस्थिती असताना गेल्या दहा पंधरा वर्षाच्या पावसाचा अभ्यास करून वार्षिक सरासरी काढली असती तर ती अधिक उपयुक्त ठरली असती. शासनाच्या या नवीन आकडेवारीचा मराठवाड्याला फटका बसतो की फायदा होतो हे येत्या काळात दिसून येणार आहे. 

जिल्हानिहाय सध्याच्या आणि नविन नियमानुसार पर्जन्यमानाची तुलनात्मक स्थिती (मिलीटमीटर) 

जिल्हा सध्याची सरासरी नवीन नियमानुसार बदल 
औरंगाबाद ६७५.४६ ६९७.०० २१.५४ 
जालना ६८८.३१ ७२१.७० ३३.३९
बीड ६६६.३६ ६९९.३० ३२.९४ 
लातूर ८०२.१३ ८६०.६० ५८.७७
उस्मानाबाद ७७६.८१ ७६०.३० १६.५१
नांदेड ९५५.५४ ९४७.४० ८.१४
परभणी ७७४.६२ ९०३.३० १२८.६८ 
हिंगोली ८९२.७६ ९२३.६० ३०.८४ 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com